मेनफिचर
शहर टुडे पान चारसाठी
------
शहरासह जिल्ह्यात टायफाईडचा उद्रेक
------
पाच महिन्यांत १,८३३ रुग्ण; जुलै-ऑगस्टमध्ये मोठी वाढ, अन्नापासून सावध राहावे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१ : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून टायफाईडच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल एक हजार ८३३ रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. विशेष म्हणजे जूननंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जुलै व ऑगस्टमध्ये अनुक्रमे ४६३ व ४५० रुग्ण आढळले. त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाणी व अन्नामुळे टायफाईडचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘टायफाईड’ या संसर्गजन्य आजाराचा प्रसार दूषित पाणी किंवा अन्नाच्या सेवनातून होतो. स्वच्छ पाणी, योग्य स्वच्छता व हात धुण्याच्या सवयींचा अभाव असल्यास संसर्गाचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार सुरक्षित पाणी, स्वच्छताव्यवस्था, अन्न हाताळताना योग्य स्वच्छता व लसीकरण हे टायफाईडच्या प्रतिबंधातील महत्त्वाचे उपाय आहेत.
.........
पाच महिन्यांतील रुग्णसंख्या
एप्रिल ३१०
मे ३१२
जून ३०१
जुलै ४६३
ऑगस्ट ४५०
एकूण १,८३३
.......
दूषित पाण्याचा धोका
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये सांडपाणी मिसळण्याची किंवा जलवाहिन्यांमध्ये गळती होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत दूषित पाण्यामुळे टायफाईडसह इतर जलजन्य आजारांचा धोका वाढतो. दूषित पाण्याचा वापर, उघड्यावर ठेवलेले अन्न, अपुरी हाताची स्वच्छता व अस्वच्छ परिसर ही संसर्गाची प्रमुख कारणे ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी शक्यतो उकळून किंवा सुरक्षित पद्धतीने शुद्ध करूनच वापरावे. अन्नपदार्थ व्यवस्थित शिजवून खावेत. उघड्यावरचे, अस्वच्छ किंवा माशा बसलेले पदार्थ टाळावेत. शौचालयाचा वापर केल्यानंतर व जेवणापूर्वी साबणाने हात धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
.......
तापाकडे दुर्लक्ष नको
टायफाईडमध्ये दीर्घकाळ ताप राहणे हे प्रमुख लक्षण आहे. त्यासोबत अशक्तपणा, डोकेदुखी, पोटदुखी, भूक मंदावणे, मळमळ, बद्धकोष्ठता किंवा जुलाब अशी लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये त्वचेवर पुरळही दिसू शकतो. ताप तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहणे किंवा प्रकृती खालावत जाणे याकडे दुर्लक्ष करू नये.
टायफाईडचे निदान डॉक्टरांच्या तपासणीनंतर केले जाते.
........
कोट
पावसाळ्यात ताप, अशक्तपणा, डोकेदुखी किंवा पोटाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांनी आजार अंगावर काढू नये. विशेषतः ताप सातत्याने राहात असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. टायफाईडचे निदान झाल्यास डॉक्टरांनी लिहून दिलेली प्रतिजैविक औषधे निर्धारित मात्रेत व पूर्ण कालावधीसाठी घेणे महत्त्वाचे आहे.
-डॉ. प्रदिप चौधरी, जळगाव.