NSK26H28543
मुक्ताईनगर : कोथळीतील जुन्या मुक्ताई मंदिर परिसरात बुधवारी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांची लाडूतुला करण्यात आली. त्या वेळी उपस्थित महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज. शेजारी मंदा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, शारदा खडसे-चौधरी, रोहिणी खडसे, गुरुनाथ आदी.
----
भाजपतील काही नेते आले नाहीत याचे दु:ख
उपशीर्षक
एकनाथ खडसे : अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आपण राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले होते. अनेक जण आले, पण भारतीय जनता पक्षाचे काही नेते आले नाहीत. आपण राजकारणातील जवळपास ४० वर्षे भाजपतच काम केले आहे. त्यामुळे हे नेते येतील, अशी अपेक्षा होती. मात्र ते आले नाहीत, याचे दु:ख आहे, अशी खंत ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
खडसेंचा अमृतमहोत्सवी सोहळा रविवारी (ता. ३०) कोथळीतील (मुक्ताईनगर) जुन्या मुक्ताई मंदिराच्या प्रांगणात झाला. सोहळ्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासह अन्य पक्षांचे राज्यातील नेते उपस्थित होते. मात्र, भाजप-शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. बुधवारी (ता. २) खडसेंनी तारखेनुसार ७५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या भेटीसाठी जिल्ह्यातील विविध भागांतून विविध पक्षांचे हजारो कार्यकर्ते मुक्ताईनगरात दाखल झाले होते. खडसेंनी मुक्ताई मंदिर परिसरातच या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.
कार्यकर्त्यांचा विरोध नाही;
काही नेत्यांचा मात्र विरोध
कोणत्याही राजकीय व्यक्तीचा अमृतमहोत्सवी सोहळा काही कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसतो. तो एक कौटुंबिक सोहळा असतो. अशा सोहळ्यांना राजकीय मतभेद बाजूला ठेवून जाणे ही खरी राजकीय संस्कृती असते. त्याच भावनेतून ३० ऑगस्टला झालेल्या कार्यक्रमास राज्यभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिले, पण आपण ज्या पक्षासाठी ४० वर्षे काम केले, त्या पक्षातील काही नेते येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते आले नाहीत, याची खंत आहे. असे असले तरी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संजय कुटे यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच आजही सकाळपासून भाजपतील अनेक कार्यकर्ते येऊन भेटत आहेत. या कार्यकर्त्यांशी आपले ऋणानुबंध आहेत. त्यांचा आपल्याला विरोध नाही, तर भाजपतील काही नेत्यांचाच विरोध आहे, हे दिसून आले. आजचा कार्यक्रम वेगळा आहे. त्यामुळे आपण त्याविषयी जास्त बोलणार नाही, असे खडसेंनी सांगितले.
चौकट
जनतेची सेवा करत राहणार
वयाच्या पंच्याहत्तरीचा टप्पा गाठल्यानंतर आता पुढे काय, याबाबत विचारले असता श्री. खडसे म्हणाले, की मी ५० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. जिल्ह्यातील, खानदेशातील व राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करीत आलोय. लोकांची सेवा करतोय. येणाऱ्या काळातही गरीब, गरजूंची सेवा करत राहू.