धुळे : टुडे पान ३ साठी... मेन
---
लोगो क्रमांक : 28534 - एसटी बस लोगो
---
लग्न, यात्रांसाठी एसटीचा प्रवास महागात
प्रासंगिक कराराच्या दरात प्रतिकिलोमीटर २० रुपयांची वाढ; ऑगस्टपासून दर लागू
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष बससेवेच्या प्रासंगिक कराराचे दर वाढविल्याने लग्न समारंभ, पर्यटन, धार्मिक यात्रा, तसेच खासगी कार्यक्रमांसाठी एसटी बस आरक्षित करणाऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. नवीन सुधारित दर व अटी ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळाने नियमित प्रवासी तिकीट दरात १३.५६ टक्के वाढ केल्यानंतर आता प्रासंगिक करारातील विशेष बससेवेचे दरही सुधारित केले आहेत. वाढते डिझेल दर, टायर, सुटे भाग, तसेच कर्मचाऱ्यांच्या भत्त्यावरील वाढता खर्च लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. नवीन दरामुळे ग्रामीण भागातील लग्नसमारंभ आणि धार्मिक यात्रांसाठी एसटी बस आरक्षित करण्याऐवजी खासगी प्रवासी वाहतुकीकडे कल वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नवीन दरपत्रकानुसार ४५ आसनी साध्या बससाठी प्रतिकिलोमीटर ७५ रुपये आकारले जाणार आहेत. शैक्षणिक संस्थांना ५० टक्के सवलत मिळत असल्याने त्यांच्यासाठी हा दर प्रतिकिलोमीटर ३७ रुपये ५० पैसे राहणार आहे. ५६ आसनी राजमाता जिजाऊ बससाठी प्रतिकिलोमीटर ९० रुपये दर निश्चित करण्यात आला असून, शैक्षणिक संस्थांना सवलतीनंतर हा दर ४५ रुपये राहणार आहे. प्रासंगिक कराराच्या नव्या नियमांमध्ये किमान आकारणी, रद्द शुल्क, अतिरिक्त वेळेची आकारणी, ई-बसासाठी स्वतंत्र नियम, तसेच अनामत रकमेतही बदल करण्यात आला आहे. याशिवाय बस स्वच्छतेसाठी प्रतिप्रवासी दोन रुपये स्वच्छता शुल्क आकारले जात आहे. एसटीच्या विशेष बससेवेच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्रामीण भागातील लग्नसमारंभ, तसेच यात्रांसाठी बस आरक्षित करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात वाढणार आहे. ग्रामीण भागात लग्नसोहळे, कौटुंबिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक यात्रांसाठी एसटी बस आरक्षित करण्याकडे नागरिकांचा पारंपरिक कल असतो. त्यामुळे दरवाढ नियंत्रित करून नागरिकांना परवडणाऱ्या दरात विशेष बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
---
१४-१
चौकट
शैक्षणिक सहलींना सवलत कायम
नवीन दरवाढीत शैक्षणिक सहलींसाठी देण्यात येणारी ५० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींसाठी एसटीचा वापर करणाऱ्या संस्थांना वाढीव दराच्या तुलनेने कमी भार सहन करावा लागणार आहे. मात्र, लग्नसमारंभ, पर्यटन आणि धार्मिक यात्रांसाठी बस आरक्षित करणाऱ्या सामान्य प्रवाशांना सुधारित दरानुसार अधिक खर्च करावा लागणार आहे. यामुळे महामंडळाने या दरांचा फेरविचार करून नागरिकांना परवडणाऱ्या दरात विशेष बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.