(बातमी आवश्यक)
--
‘त्या’ व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी
उपशीर्षक
महामार्गावरील अपघातांचे बळी; अरविंद देशमुख यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पाळधी- जळगाव नवीन बायपासच्या कामाची स्थिती, उड्डाणपुलाचा भराव खचणे, वाहतुकीचे नियोजन, सूचना फलक याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही उपयोग झाला नाही. या अक्षम्य दुर्लक्षामुळे महिनाभरात महामार्गावर सात जणांचा बळी गेला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच कंत्राटदारावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केली आहे.
श्री. देशमुख यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन दिले आहे. त्यात महामार्गावरील कामाची स्थिती, निकृष्ट दर्जाचे काम, पुलाचा भराव खचल्यानंतर बंद केलेली वाहतूक, बॅरिकेडिंग, सूचना फलक, रिफ्लेक्टर, प्रकाशव्यवस्था व इतर आवश्यक सुरक्षा उपाय यासंदर्भात प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास निवेदन देऊन अवगत केले होते. तसेच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासह उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती.
महिनाभरात महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे अपघातांची संख्या वाढली. प्राणांतिक अपघात होऊन सात जणांचा बळी गेला. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
भरपाई द्यावी
याप्रकरणी पोलिस अधीक्षकांच्या पुढाकारातून कंत्राटदारावर गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी तेवढी कारवाई पुरेशी नाही. कारण बळी गेलेल्यांमध्ये अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष मृत्युमुखी पडलेत. तरी या दुर्घटनांमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष न्याय मिळणेही तितकेच आवश्यक आहे.
चौकट
कुटुंबीयांना न्याय द्या
जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष या नात्याने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून वरील सर्व मृत नागरिकांच्या प्रकरणांची स्वतंत्रपणे पडताळणी करावी. संबंधित मृतांच्या कायदेशीर वारसांना लागू कायदे, विमा तरतुदी व शासनाच्या प्रचलित नियमानुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-----