NSK26H28622
जळगाव : ‘ऋतुमती अभियान’च्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रूपाली बेंडाळे. सोबत प्राचार्य डॉ. पराग नारखेडे व मान्यवर.
सकस आहार, व्यायामातून सुदृढ आरोग्य साधा
डॉ. रुपाली बेंडाळे : चौधरी महाविद्यालयात ‘ऋतुमती अभियानास’ प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३ : स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहणे ही आजच्या काळाची गरज आहे. सकस आहार, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी आणि योग्य झोप या सुदृढ आरोग्याच्या मूलभूत गोष्टी आहेत. युवतींनी आहारात फळे व पालेभाज्यांचा नियमित समावेश करून हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखावी, असा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रूपाली तुषार बेंडाळे यांनी दिला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय महिला आरोग्य संवर्धन ‘ऋतुमती अभियानास’ मंगळवारी (ता. २) प्रारंभ झाला. डॉ. रूपाली बेंडाळे यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. हे अभियान २ व ३ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येत आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पराग नारखेडे म्हणाले, अभ्यासाचा ताण असला तरी तरुणींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. प्रीती बोंडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अनिल सोनवणे, सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. देवयानी पाटील यांच्यासह प्राध्यापिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. देवयानी पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. प्रज्ञा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
आहारात फळे, पालेभाज्या हव्या
युवतींच्या आरोग्य संवर्धन विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. बेंडाळे म्हणाल्या, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. त्यामुळे आहारात फळे, पालेभाज्या यांचा समावेश करावा. व्याख्यानानंतर त्यांनी विद्यार्थिनींच्या आरोग्यविषयक शंकांचे निरसन केले.