भरती परीक्षा सुधारणेसाठी ४,५०० हजार अभिप्राय
डॉ. गेडाम : उच्चस्तरीय समितीचा ३० सप्टेंबरला नाशिक दौरा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. परीक्षा प्रक्रियेतील सुधारणेसाठी सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. नाशिक विभागातून आतापर्यंत चार हजार ५०० सूचना व अभिप्रायांचे ई-मेल विभागीय महसूल आयुक्त कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. दरम्यान, परीक्षा सुधारणेसाठी स्थापन उच्चस्तरीय समिती ३० सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर येणार आहे.
स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठी मंत्रालयातील अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी व संबंधित हितधारकांशी चर्चा करणार आहे. समितीचे अध्यक्ष व सदस्य ३० सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सकाळी अकराला कामकाजाचा आढावा घेतील. या वेळी विद्यार्थी व नागरिकांशी ते संवाद साधणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष
भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित घटकांनी १७ ते २५ सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत (कार्यालयीन वेळेत) सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने सादर करता येतील. नागरिक, संस्था व संबंधित घटकांनी त्यांचा अभिप्राय आस्थापना शाखा, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक अथवा nashik examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर अथवा नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.