ॲंकर
टुडे पान एकसाठी
---------------
(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पासपोर्ट वापरावा)
----------
जिल्ह्यात गुरुवारपासून सेवा संकल्प अभियान
-----
प्रत्येक तालुकास्तरावर शासकीय योजनांचा पात्र नागरिकांना लाभ मिळणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील २५ वर्षांच्या कार्यकीर्दीनिमित्त व सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा, लोककल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर सेवा सेतू अभियान राबवून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा पात्र नागरिकांना थेट लाभ देण्यात येणार आहे.
या उपक्रमात आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत अर्जप्रक्रिया पूर्ण करून जागेवरच लाभ देण्यात येतील. शिवाय तालुकास्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. वनहक्क दाव्यांची सुनावणी व मंजुरीची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
सेवा सेतू अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, जीवंत सातबारा मोहीम, स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते, शिधापत्रिका वितरण, नॉन-क्रिमीलेअर व दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, नवीन नळ व घरगुती विद्युत जोडणी, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासह विविध २२ सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स व ग्रामीण नवसंशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज (Innovation Challenge) आयोजित करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग हा या उपक्रमासाठी नोडल विभाग म्हणून काम करणार आहे.
‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक गाव व प्रभागात स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, रस्तेसुरक्षा जागृरुकता, सरकारी योजनांची जागरुकता, प्लास्टिकमुक्ती व डिजिटल साक्षरता यांसह २६ लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
विकसित भारत संकल्प व सेवा ज्योत यात्रा उपक्रमांतर्गत राज्यातील परिवर्तनकारी प्रकल्पांची माहिती जनसंपर्क विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गावोगावी व शहरांत दुचाकी रॅली व सेवा ज्योत यात्रा काढून विकसित भारत २०४७चा संकल्प घेण्यात येणार आहे.
शाळांमध्ये विकसित भारत या संकल्पनेवर आधारित वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्यांचे जिल्हा व राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. अंगणवाड्यांत माता-बालकांसाठी पोषण व आरोग्य मार्गदर्शन, आशा व अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
चौकट
जनसेवक महाकुंभने समारोप
कलापथकांमार्फत दोन ऑक्टोबरला शासकीय योजनांची माहिती देणारे नाट्यप्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत. १७ ऑक्टोबरला सरपंच ते संसद सदस्यांपर्यंतच्या लोकप्रतिनिधींचा ‘जनसेवक महाकुंभ’ आयोजित करून या अभियानाची सांगता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी विकसित भारताचा संकल्प घेणार आहेत. यासाठी ग्रामविकास विभाग हा नोडल विकास म्हणून काम पाहील. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीयस्तरावर विभागीय आयुक्त व राज्यस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष संनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.