किरकोळ वादातून तरुणाचे नाकच कापले
--------
कुसुंबा येथील घटना; दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२० : विवाहितेशी बोलणे अचानक बंद झाल्याने तिच्या पतीशी वाद घालून दोघांनी कटरपट्टी व कात्रीने हल्ला चढविला. यात पट्टीने दोन-तीन वार करून कात्रीने तरुणाच्या नाकाचा शेंडाच कापून टाकला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कुसुंबा येथील स्वामी समर्थ शाळेच्या मागे कांचन व भूषण पाटील हे दाम्पत्य वास्तव्यास आहेत. त्यांच्याच घराजवळ वास्तव्यास असलेला स्वप्निल राजेंद्र पाटील (वय २३) याच्याशी कांचन पाटील सहज बोलत होत्या. मात्र, पतीने समज दिल्यानंतर अचानक बोलणं बंद केल्याने स्वप्नील पाटीलचे पित्त खवळले. त्यातच शनिवारी(ता.१९) दुपारी अडीचच्या सुमारास कांचन पाटील व त्यांचे पती भूषण लक्ष्मण पाटील (वय ३६) असे दोघे घरी असताना संशयित स्वप्निल राजेंद्र पाटील (वय २३) व धीरज संतोष खंडाळकर (वय २३) असे दोघे त्यांच्या घरी आले. दोघांनी शिवीगाळ करीत विवाहितेच्या पतीवर धारदार पट्टीने व कात्रीने हल्ला चढवला. मानेवर, नाकावर व काखेत वार करून गंभीर जखमी केले. हल्लेखोरास त्याचा मित्र धीरज खंडाळकर याने चिथावणी देत भूषणला संपवून टाकण्यासाठी हल्ला करण्यास प्रवृत्त केले.
दोघांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर गंभीर जखमी भूषण पाटील यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कांचन पाटील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित स्वप्निल पाटील व धीरज खंडाळकर यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक बबन अव्हाड यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी केली. दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजश्री पाटील करीत आहेत.