पान तीन
----------------
13971
नाशिक : पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून रामतीर्थसह गोदा घाट परिसरास भेट देत करण्यात आलेली पाहणी.
रामतीर्थसह गोदाघाटाची सुरक्षा व्यवस्था मजबूत
पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडामधून आठ पथके तैनात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक ता.२३ : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ तसेच इतर पोलिस ठाण्यांच्या कक्षेत येणारे गोदाघाट परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. रामतीर्थ परिसरातील धार्मिक स्थळे, स्नानघाट आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पंचवटी, भद्रकाली पोलिस ठाण्यातून ३ तर सरकारवाडा ठाण्याचे २ असे आठ पथक नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दंगल नियंत्रण पथक २४ तास रामतीर्थ परिसरात कार्यरत असणार आहे.
अहिल्याबाई होळकर पूल ते रामतीर्थ स्नानघाट, जुने भाजी पटांगण ते म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण ते टाळकुटेश्वर पूल, गांधी तलाव, देवमामलेदार ते निळकंठेश्वर, कपुरथळा मैदान ते रोकडोबा घाट, टाळकुटेश्वर घाट आणि लक्ष्मीनारायण घाट या संवेदनशील ठिकाणी पोलिस अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.
संपूर्ण घाट परिसराच्या बंदोबस्तासाठी पंचवटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत मोहिते यांची पर्यवेक्षक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिस ठाण्यांतील अधिकारी तसेच दंगल नियंत्रण पथक, ट्रॅफिक वॉर्डन आणि अंमलदार यांची विविध घाटांवर नेमणूक करण्यात आली आहे.
रामतीर्थ येथे दंगल नियंत्रण पथकाचे २४ तास विशेष पथक तैनात राहणार असून दिवसपाळीत नऊ तर रात्रपाळीत पाच कर्मचारी कार्यरत राहतील. रामतीर्थ गोदाघाट, प्रमुख मंदिरे, साधुग्रामाकडे जाणारे मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी सातत्याने गस्त घालण्याचे निर्देश दिले आहेत. अफवा, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, संशयास्पद व्यक्ती व बेवारस वस्तूंवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी गर्दी व्यवस्थापन, स्वतंत्र प्रवेश-निर्गमन मार्ग, बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक, सार्वजनिक सूचना प्रणाली, सीसीटीव्ही निगराणी, बॉम्ब शोधक, नाशक पथक, श्वान पथक तसेच ड्रोन निरीक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला सुरक्षा, हरवले-सापडले केंद्र, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी मदत व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष कृती आराखडाही तयार ठेवण्यात आला आहे.
..............
दैनंदिन अहवाल वरिष्ठांना सादर
नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांकडून त्यांच्या क्षेत्रातील परिस्थितीचा आणि संवेदनशील घटनांचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. दैनंदिन हा अहवाल वरिष्ठांना सादर करता येणार आहे. वरिष्ठांकडून त्याचे पडताळणी करून आगामी सिंहस्थ पर्वातील बंदोबस्तात आणखी काय सुधारणा करता येतील. कशा पद्धतीने नियोजन करता येईल. याबाबतचे नियोजन करणे त्यांना शक्य होणार आहे.
............