एटीएम कार्डची हेराफेरी
प्रकरणी चौघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २६ : शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड बदलून त्याच्या खात्यातून १७ हजार ३०० रुपये काढून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांमध्ये हरियाना आणि उत्तर प्रदेशातील चार जणांचा समावेश असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, विविध बँकांचे एटीएम कार्ड, तीन मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली.
संशयितांमध्ये अलीम रमजान मेव, समुन रमजान मेव व नासीर दिनू मेव (तिघे रा. घागोट, जि. पलवल, हरियाना) आणि सलमान फजरुद्दिन मेव (चिट्टर, जि. बुलंद शहर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. घटनाक्रमानुसार दीपक अमृत चौधरी (वय ६६) २३ जूनला वरझडी रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. मशिनमध्ये रोकड नसल्याचे सांगत संशयितांनी त्यांच्याशी संवाद साधला. हातचलाखीने त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करण्यात आली. काही वेळातच त्यांच्या खात्यातून दहा हजार आणि सात हजार ३०० रुपये काढल्याचे संदेश मोबाईलवर आले. त्यांनी हातातील कार्ड तपासले असता ते दुसऱ्या व्यक्तीचे असल्याचे लक्षात आले. याबाबत चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दिली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत चांदवड (जि. नाशिक) येथील हॉटेलमधून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयितांकडून कार, विविध बँकांचे एटीएम कार्ड, तीन मोबाईल आणि गुन्ह्यातील शिल्लक सात हजारांची रोकड जप्त करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोरकुमार परदेशी, शोध पथकाचे हवालदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, सचिन वाघ, आरीफ तडवी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके, मिथुन पवार आदींनी ही कामगिरी केली.