नाशिक : वातावरणातील बदलांमुळे कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या जिल्ह्यात पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना दाखल केले जात आहे. परंतु, या रुग्णांची हेळसांड होत आहे. कोरोना कक्षात दाखल रुग्णांची नियमित वैद्यकीय चाचणी घेतली जात नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित रुग्णांची तपासणी केली जात नाही.
शिकाऊ डॉक्टरांच्या (इनटर्न) भरवशावर कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार केला जात असून, याबाबत नातलगांकडून विचारणा केली असता, समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. तसेच, रुग्णांना लागणारे साहित्यही त्यांना स्वखर्चाने बाहेरून खरेदी करावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यानेच या ठिकाणी येणाऱ्या कोरोना रुग्णांची मात्र उपचाराबाबत हेळसांड होत असल्याने नातलगांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना कक्ष आहे. या कक्षामध्ये सुमारे ३० ते ३५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, या रुग्णांची नियमित आरोग्य तपासणी वा तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयात आलेल्या शिकाऊ डॉक्टरांची (इन्टर्न) या कक्षात नियुक्ती केली जाते. परंतु या शिकाऊ डॉक्टरांना ना रुग्णांना व्हेंटिलेटर लावता येते, ना तपासणीसाठी रक्त काढता येते. यात मात्र रुग्णांचा हकनाक त्रास सहन करावा लागतो आहे.
त्यातच एखादी दुर्घटना घडून रुग्णांचा जीव गेल्यास यास जबाबदार कोण, असा प्रश्न रुग्णांच्या नातलगांकडून केला जात आहे. याबाबत नातलगांनी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. तर, कक्षात असलेल्या कर्मचाऱ्यांकडे काही साहित्यांची मागणी केली असता, तीही पुरविली जात नाही. त्यामुळे रुग्णांसाठी लागणारे साहित्य बाहेरून खरेदी करून आणावे लागत आहे.
चांदवडच्या रुग्णाची आपबिती
चांदवड येथील गोरख तक्ते या ५७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी स्वतंत्र कक्ष नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले. याठिकाणी तक्ते यांच्यासह सुमारे ३० ते ३५ कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहेत. परंतु, याठिकाणी रुग्णांना कोणतीही सुविधा मिळत नसल्याचा आरोप तक्ते यांनी केला आहे. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या तपासणीसाठी येत नाहीत. शिकाऊ डॉक्टर अंतर राखून रुग्णांशी संवाद साधतात. अन्य कर्मचारी रुग्ण व त्यांच्या नातलगांशी उर्मटपणे वागत असल्याचा आरोप तक्ते यांनी केला आहे. यासंदर्भात तक्ते यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशीही संवाद साधला होता.
''चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. परंतु अजून एकदाही तज्ज्ञ डॉक्टर तपासणीला आलेले नाहीत. शिकाऊ डॉक्टर्स आहेत, पण त्यांना काहीच कळत नाही. तपासणीसाठी रक्त काढताना त्यांना नसा सापडत नाहीत. आर्थिक परिस्थिती नाही म्हणून सरकारी रुग्णालयात दाखल झालो.'' - गोरख तक्ते, रुग्ण
''कोरोना कक्षासाठी मेडिसीन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. तसेच दाखल रुग्णांची नियमित तपासणी होते आहे. तरीही काही तक्रार असेल तर स्वतः लक्ष घालून विचारणा करतो.'' - डॉ. उत्कर्ष दुधेडिया, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय