Unseasonal Rain Crop Damage : आभाळ फाटलं,काळीज तुटलं, तळहाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं अशी काहीशी परिस्थिती रविवारी (ता.९) संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे झाली आहे.
द्राक्षबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या वादळी वाऱ्यात चांदोरीमध्ये ३० एकर हुन अधिक द्राक्षबागा वाकल्या असून १०० एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा हा कोटीच्या घरात जात असल्याचा अंदाज वर्तीवला आहे. (Unseasonal Rain Damage 30 acres of grapes area of more than 100 acres affected Nashik News)
परिसराला गेल्या दीड महिन्यात तीनदा अवकाळीने दणका दिला आहे. यामुळे फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या वादळी वाऱ्यात अनेक द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. वारंवार अवकाळी आणि वादळी वाऱ्याच्या संकटाने शेतकऱ्याला पुरते उध्वस्त करुन टाकले आहे.
चांदोरी, खेरवाडी, चितेगाव, सुकेणे परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा फटका बसला. द्राक्षबागा वाकल्याने द्राक्षघडांचे नुकसान झाले असून ते मातीमोल ठरले आहेत. गहू, कांद्याला ही मोठ्या प्रमाणात बसला आहे. चांदोरीतील संजय कोरडे यांनी दोन एकर बाग जोपासली होती.
मात्र रविवारी संध्याकाळच्या वादळी वारे आणि अवकाळीने सर्व बाग आडवी झाली आहे. गतवर्षी कोरोनाने आणि यंदा अवकाळीने शेतकरी संकाटात गेला आहे. ‘आपले सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे संजय कोरडे यांनी सांगितले.
त्यांच्यासह बाळासाहेब आहेर, संजय कोरडे, भाऊसाहेब खर्डे, प्रवीण कोरडे, विष्णू गायखे, सोमनाथ लोंढे, सुरेश गडाख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा पार वाकल्या आहेत. इतर शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेतील मण्यांना तडे गेले आहे.
गेल्या काही दिवसात व्यापारी द्राक्षांच्या खरेदीसाठी आले नव्हते. चार दिवसापासून पुन्हा तोडणीला सुरुवात झाली आणि पुन्हा अवकाळीने दणका आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या फवारणीचा खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे.
राज्य शासन आणि राज्यातील नेते अयोध्या दौरा आणि इतर वादात मश्गुल असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कोण पाहणार असा सवाल आता शेतकरी करु लागला आहेत.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
सरकार न्याय कधी देणार?
अवकाळीच्या तडाख्याचा प्रसंग सागताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होते. हे नुकसान कसे भरून निघणार या शेतकऱ्यांना सरकार कसा न्याय देणार, हे देखील आज पाहणे गरजेचे आहे.
भोज वस्ती परिसरात मुरलीधर निवृत्ती कोरडे यांच्या घराचे पत्रे उडून जात भिंत कोसळत मुलगा सार्थक जखमी झाला. दरम्यान दिवसभरात तहसीलदार शरद घोरपडे, माजी आमदार अनिल कदम, यतीन कदम, सिद्धार्थ वनारसे, संदीप टर्ले, शिरीष गडाख, सरपंच विनायक खरात आदींनी नुकसानीची पाहणी केली.
"अवकाळीने द्राक्षशेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, ही परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या दोन- तीन वर्षांत ५० टक्के द्राक्ष बागा शेतकरी काढून टाकतील. अस्मानी संकटातून शेतकरी आणि द्राक्षशेती वाचवायची असेल तर शासनाने अवकाळी पावसाने द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. तत्काळ नुकसानभरपाई द्यावी."
- बाळासाहेब आहेर, नुकसानग्रस्त शेतकरी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.