Unseasonal Rain Crop Damage : गत पंधरवड्यात झालेल्या अवकाळीच्या नुकसानीतून शेतकरी अद्याप सावरलेला नसताना पुन्हा इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी (ता. ९) संध्याकाळी सातच्या सुमारास जोरदार वादळी वारा अन मेघगर्जनेसह तब्बल तासभर झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
गहू, हरभरा, कांदा तसेच टोमॅटो, वांगी, काकडी, भेंडी, मका आदी भाजीपाल्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात काढणी करून पोळ लावून ठेवलेला हरभरा, काढणीसाठी आलेला गहू, कांदा पीक गारपिटीने अक्षरशः झोडपून काढला आहे.
आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे. (Unseasonal Rain Damage Hundreds of hectares affected in eastern part of Igatpuri nashik news)
रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. संध्याकाळी सातच्या सुमारास विजांचा कडकडाट अन वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाला सुरवात झाली.
तासभर झालेल्या गारपिटीने पूर्व भागातील शेणित, साकूर, नांदगाव बु, पिंपळगाव घाडगा, पिंपळगाव डुकरा, कवडदरा, धामणी, धामणगाव, बेलगाव तऱ्हाळे, वंजारवाडी आदी गावातील परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे.
यामुळे काढलेल्या पिकांसह कोरडा चारा, गोवऱ्या झाकण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली होती. काढणीसाठी आलेल्या गहू, हरभरा, कांदा व इतर बागायती पिकांसह चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पानेही शिल्लक राहिली नाही
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात तासभर झालेल्या गारपिटीने फुले, फळाचे सोडा झाडांना पाने देखील शिल्लक राहिली नाहीत. टोमॅटो, वांगी, काकडी, भेंडी, कांदा आदी बागायती पिकांमध्ये तर अर्ध्या फुटांवर गारांचा खच साचला होता.
तासभर झालेल्या गारांच्या माऱ्यामुळे झाडाला फुले, फळ सोडा तर अक्षरशः पाने सुद्धा शिल्लक राहिली नाहीत. पूर्णतः पीकच नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी व पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
लोकप्रतिनिधी उदासीन
इगतपुरी शहर ः तालुक्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. यात गारा पडल्यामुळे गहू, मका, काकडी, मिरची, वांगे, कोबी, फ्लावर आदी भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.
आता त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही एकही स्थानिक प्रतिनिधीने दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करतानाही कुणी दिसत नाही याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
"आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना हा दुसरा मोठा फटका आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून जपलेली पिके गारपिटीमुळे पूर्णतः नष्ट झाली आहेत. टोमॅटो, वांगी, काकडी, भेंडी, मका, कांदा आदींचा हंगाम ऐन बहरात असतानाच शेतकऱ्यांवर दुसऱ्यांदा अस्मानी संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी."
- सुरेश सहाणे, बागायतदार शेतकरी, साकूर.
"इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात गारपिटीसह जोरदार पावसाने पिकांची मोठी हानी झाली आहे. अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडला असून यामुळे बळीराजा पूर्णतः उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी सरकारने त्वरित सर्वतोपरी मदत करावी." - गौतम भोसले, शेतकरी, धामणी.
"अगोदरच्या नुकसानाची पंचनामे होतात न होतात तेच आता पुन्हा एकदा गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतातील पीक पूर्णतः उध्वस्त झाले आहे. पिकांची दुसऱ्यांदा नासाडी झाली आहे, त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज, औषध पाण्याचा खर्च निघणार कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे." - पांडुरंग वारुंगसे, शेतकरी, बेलगाव तऱ्हाळे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.