येवला : ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात आता मराठा समाज आक्रमक भूमिका घेत असल्याने आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. येवला तालुक्यासह मतदारसंघात पंचवीसवर गावांत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीचे फलक झळकले असून, काही ग्रामपंचायतीने तसे ठरावही केले आहेत.
‘जो समाजाला मानत नाही, समाज त्याला मानत नाही’, अशी भूमिका ग्रामस्थ घेत असल्याने आरक्षणाची चळवळ अधिक गतिमान झाली आहे. (village Leaders ban boards seen in twentyfive villages Society aggressive for Maratha reservation nashik)
मंत्री भुजबळ यांनी आरक्षणप्रश्नी घेतलेली भूमिकेबाबत राज्यासह मतदारसंघातही त्यांच्याविषयी नाराजी आता कृतितून दिसत आहे. मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते जयदत्त होळकर यांनी पक्षांच्या पदाचा राजीनामा दिल्याने हा विषय अधिकच चर्चेत आला आहे.
त्यातच तब्बल २० ते २५ गावांनी प्रवेशद्वारावरच फलक लावून नेत्यांना गावबंदीची आक्रमक भूमिका घेतल्याने आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी लढा उभारला असून, या लढ्याला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आमदार-खासदार व मराठा समाज आरक्षणाला विरोध करणारे राजकीय नेते, कार्यकर्ते अडचणीत आले असून, तालुक्यातील गावगावांत लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्त्यांना गावबंदीचे फलक लावले आहेत.
तालुक्यातील कातरणी येथे ग्रामसभा घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली, तर देवरगाव ग्रामपंचायतीने तहसीलदारांना पत्र देत आरक्षणविरोधी पुढाऱ्यांना गावात प्रवेश करण्यास, तसेच नेत्यांना किंवा त्यांच्या पक्षाला सभा घेण्यास बंदी घातली आहे.
अनकुटे ग्रामपंचायतनेही असाच निर्णय घेतला असून, मराठा आरक्षणविरोधी नेते, कार्यकर्त्यांना गावात प्रवेश बंद केला आहे.
सकल मराठा समाजातर्फे सायगाव, गोरखनगर, बदापूर, नागडे, कातरणी, विसापूर यांसह अनेक गावांमध्ये आरक्षणविरोधी पुढाऱ्यांना गावबंदी केल्याचे संदेश सोशल मीडियात फिरत आहेत.
आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाज आता आक्रमक झाला असून, आरक्षणाच्या लढ्याची झळ आमदार, खासदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनाही बसत आहे. लोकप्रतिनिधींची अधिकच कोंडी होणार आहे.
काही गावांनी लोकप्रतिनिधींना गावबंदी केल्याचे लोन आता तालुकाभर पसरू लागले आहे. यामुळे तालुक्यातील बहुतांश गावांत सध्या राजकीय कार्यक्रम बंद आहेत.
गावात जाऊन अभिनंदन
तालुक्यातील जवळपास २० ते २५ गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केली आहे. अनेक ग्रामपंचायतीने आशयाचे ठराव मंजूर केले आहेत.
तालुका सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे गावबंदी केलेल्या गावांमध्ये जाऊन तेथील सकल मराठा समाजाचे आभार मानले जात आहेत.
तालुक्यातील प्रत्येक गावात गावबंदी करावी, तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा विषय तालुक्यात मोठ्या ताकतीने राबविला जाईल, अशी माहिती येथील मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.