टंचाईग्रस्त भागात 401 टँकरने पाणीपुरवठा; टंचाईत यंदा 244 वाड्यांची भर

Water Tanker
Water Tankeresakal

नाशिक : राज्यातील ४९७ गावे आणि ८३७ वाड्यांना गेल्या वर्षी मेअखेरच्या आठवड्यात ३८८ टँकरद्वारे (water tanker) पाणीपुरवठा (water supply) करण्यात येत होता. यंदा ४५५ गावे आणि एक हजार ८१ वाड्यांना ४०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५३ गावांसह ११६ वाड्यांची तहान स्थानिक पातळीवर भागविणे शक्य होत नसल्याने ४६ टँकर वाढवावे लागले आहेत. (Water supply by 401 tankers in water scarcity areas Nashik News)

गेल्या वर्षी ऐन उन्हाळ्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात म्हणजे, जवळपास निम्म्या राज्यात एकही टँकर सुरू नव्हता. आता सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात अद्याप एकही टँकर नाही ही दिलासादायक बाब आहे. गेल्या वर्षी नागपूर जिल्ह्यातील १७ गावांसाठी १५ टँकर धावत होते.

सध्याची टॅंकरची स्थिती
सध्याची जिल्हानिहाय टँकरची स्थिती गावे आणि वाड्या या क्रमाने (कंसात टँकरची संख्या) ः ठाणे- ३७-१४५ (३२), रायगड- ४९-२१५ (३३), रत्नागिरी- ५२-८१ (८), पालघर- १७-५८ (२८), नाशिक- ८१-११७ (७१), धुळे- १-२ (१), नंदुरबार- ०-२ (१), जळगाव- ८-० (७), नगर- २७-७८ (२२), पुणे- ५१-२७० (५४), सातारा- १२-३० (८), सांगली- ८-६० (८), औरंगाबाद- १-० (१), जालना- २०-१२ (२५), बीड- १-४ (३), परभणी- २-० (१), हिंगोली- १३-० (१९), नांदेड- ६-७ (१०), अमरावती- १७-० (१७), वाशिम- ५-० (५), बुलडाणा- २५-० (२५), यवतमाळ-२२-० (२२).

टॅंकरची संख्या वाढतेय
गेल्या वर्षी मेच्या अखेरच्या आठवड्याच्या तुलनेत आता ठाणे, रत्नागिरी, पालघर, सातारा, औरंगाबाद, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील टँकरची संख्या कमी आहे. इतर जिल्ह्यांतील टँकरची संख्या मात्र आता वाढलेली आहे. प्रत्यक्ष मॉन्सूनला सुरवात होऊन पावसाचे पाणी विहिरी, बोअरमध्ये उतरत नाही तोपर्यंत टंचाईच्या झळा कायम राहणार आहेत. गेल्या आठवड्यात राज्यातील ४०२ गावे आणि ९५६ वाड्यांसाठी ३५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मागील आठवड्याच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील टँकरची संख्या दोनने वाढली आहे. रायगड जिल्ह्यात सहा, पालघरमध्ये एक, नाशिकमध्ये नऊ, जळगावमध्ये एक, पुण्यात तीन, जालन्यामध्ये सहा, हिंगोलीत एक, अमरावतीमध्ये तीन, बुलडाण्यामध्ये सहा आणि यवतमाळमध्ये तीन टँकरनी वाढ झाली आहे.

३७ टक्के जलसाठा शिल्लक
राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये बुधवार (ता. २५) अखेरपर्यंत ३६.६८ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ३६.२७ टक्के जलसाठा शिल्लक होता. अमरावती विभागात एक हजार ९२४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच विभागाच्या एकूण साठ्याच्या ४७.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मराठवाडा विभागात तीन हजार ३२७ दशलक्ष घनमीटर (४५.१३ टक्के), कोकणात एक हजार ५६७ दशलक्ष घनमीटर (४४.६५ टक्के), नागपूरमध्ये एक हजार ६२० दशलक्ष घनमीटर (३५.१८ टक्के), नाशिकमध्ये दोन हजार १३८ दशलक्ष घनमीटर (३५.६२ टक्के), पुण्यात चार हजार ३८१ दशलक्ष घनमीटर (२८.८ टक्के) जलसाठा आता आहे.

Water Tanker
राज्यात जूनमध्ये ६ दिवस हलक्या पावसाचा अंदाज

विभागनिहाय टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची स्थिती
विभागाचे नाव गावे वाड्या सध्याचे टँकर गेल्या वर्षीचे टँकर गावे वाड्या
कोकण १५५ ४९९ १०१ ११६ १९४ ५०७
नाशिक ११७ १९९ १०२ ७० ९१ १०८
पुणे ७१ ३६० ७० ५६ ५५ १९८
औरंगाबाद ४३ २३ ५९ ६७ २४ ५८
अमरावती ६९ ० ६९ ७३ ७३ ०
नागपूर ० ० ० १५ १७ ०

Water Tanker
व्‍यथा ज्‍येष्ठांच्‍या : बँक, पोस्‍टात रांगा... 2-4 तास थांबा...

जलसंकटाबद्दलची हवीय गांभीर्यता
टँकरद्वारे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातून राज्यातील जलसंकटाबद्दलची गांभीर्यता हवीय हे चित्र ऐरणीवर आले आहे. स्वाभाविकपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत टंचाईचा आणि पाण्याच्या उपलब्धतेच्या आढाव्यापुरते मर्यादित न राहता, आता आगामी काळात टँकरवर पाण्यासारखा वाहणारा पैसा कमी करण्यासाठी जलसंकटावरील ठोस उपाययोजनांचा कृती कार्यक्रम आखत यंत्रणांकडून होत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यापर्यंतचा विचार व्हायला हवा, अशी जनतेची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com