
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून संततधार (Rain) सुरू असल्याने सारा जिल्हा जलमय झाला आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी दिवसभर ढगाळ व वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शेगवे (ता. नवापूर) येथे पुरात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नवापूर शहरातील रंगावली नदीकाठच्या भागातील दोनशे कुटुंबांना सोमवारी रात्रीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. (Rest of rain after 4 days Nandurbar latest Monsoon News)
जिल्ह्यातील सारेच मध्यम व लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. नदी -नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पावसाचा अंदाज पाहता नदी काठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तालुक्यात तीन दिवसांपासून संततधार सुरु होती. संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. आज दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. तालुक्यातील मध्यम प्रकल्पसह सर्व बंधारे, मध्यम प्रकल्प , नदी -नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
नागपूर -सूरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी जवळचा पूल पाण्याखाली गेल्याने सोमवारी (ता.११) महामार्गावर वाहतूक बंद आहे. या मार्गावरील वाहतूक वळवून नंदुरबार मार्गे जाण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेताचा बांध फुटल्याने नुकतीच पेरणी केलेले बियाणे व पिके वाहून गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे.
दरम्यान, नदी-नाल्या शेजारील वस्तीत पावसाचे पाणी शिरून जीवितहानी होणार नाही यासाठी तलाठी , मंडळ अधिकारी संबंधित गावांचा संपर्कात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पावसाची इत्थंभूत माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचे काम होत आहे.
नवापूर शहरातील रंगावली नदीपात्रातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या नागरिकांच्या संरक्षणाच्या हेतूने या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांनी आपले मौल्यवान सामान, महत्त्वाचे कागदपत्रे, अन्य महत्त्वाचे साहित्यासह इदगाह रोड, सार्वजनिक हॉल, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्थलांतर केले आहे. आवश्यकतेनुसार नगरपालिका टाऊन हॉल, अग्रवाल भवन आणि हनुमान वाडी या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात आली आहे.
पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू
शेगवे (ता. नवापूर ) येथे खैरवे धरणाच्या बॅक वॉटरच्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.मृत महिलेचे नाव ज्योती असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही.
ती महिला नवापूर तालुक्यातील नसून बाहेरून आलेली आहे. तिचा नातेवाइकांचा शोध सुरु आहे. जिल्ह्यातील पावसाचा पहिला बळी ही महिला ठरली आहे. ती वेडसर असल्याची माहिती महसुल विभागाने दिली आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
दरा मध्यम प्रकल्प (ता.शहादा )धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत २४ तासात वाढ झाली असून सद्यःस्थितीत पाणीपातळी ३०९.२० मीटरची नोंद झाली असून प्रकल्प १०० पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील ७२ तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने वाकी नदीच्या काठावरील विरपूर, रामपूर, फत्तेपूर, शिरुड त.हवेली, कानडी त.हवेली, चिखली, औरंगपूर, कोठली त.हवेली, परिवर्धा, वैजाली, नांदर्डे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सुकी नदीचा पाणी पातळीत वाढ
भुरीवेल लघु पाटबंधारे योजना (ता. नवापूर) धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत २४ तासात वाढ झाली असून सद्य:स्थितीत पाणीपातळी १०७ मिमी नोंद झाली असून, प्रकल्प १०० पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील ७२ तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने सुकी नदीच्या काठावरील भुरीवेल, थुवा, आमपाडा, खाटीजांबी, काटासवाण नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नदीकाठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.