धुळे : गेल्या चार वर्षांच्या महापालिकेतील सत्ताकाळात धुळेकरांच्या नजरेत भरेल असे एकही काम सत्ताधारी भाजपला करता आले नाही.
विकासाच्या नावाखाली केवळ शेकडो कोटी रुपयांचा चुराडा तेवढा झाला, बोगस कामे टाकून कोट्यवधींची बिले तेवढी काढली, नागरिकांना केवळ आश्वासने दिली, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मंगळवारी (ता. १०) महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले. अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालून शहरातील समस्यांचा पाढा वाचला. (Shiv Sena accused administration along ruling BJP Movement in Municipal Corporation Dhule News)
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासाठी चार वर्षांपासून फक्त दसरा, दिवाळी, आखाजी असे तारीख पे तारीख आश्वासन दिले जात आहे. या योजनेचे ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही.
धुळेकरांना दोन-तीन दिवसांआड पाणीपुरवठ्यातही सत्ताधारी कमी पडले. पाण्याच्या नावाखाली भाजपच्या मंत्र्यापासून ते खासदार, नगरसेवकांनी आश्वासने दिली. नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात मात्र त्यांना अपयशच आले.
रस्त्यांची अवस्था बिकट
शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेकदा रस्त्यांवर रस्ते बनवून लाखो रुपयांचे बिले काढली गेली. वेळेवर धुरळणी, फवारणी होत नसल्याने डासांच्या समस्येने नागरिक हैराण आहेत. मलेरिया, डेंगीची साथ वाढत आहे. आरोग्य यंत्रणेवर अंकुश नसल्याने साथीचे आजार पसरत आहेत, गोवरची साथ हे त्याचे उदाहरण असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
चहूबाजूला उकिरडे
अद्यापही शहरातील ४० टक्के भागातील कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे शहराच्या चहूबाजूला कचऱ्याचे उकिरडे आहेत. ठेकेदाराने बोगस कंपनीचे पथदीप लावण्याने अर्धेअधिक शहर अंधारात असते. एकंदरीतच सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन तसेच सत्ताधारी भाजप अपयशी ठरले आहे. आता महापौर बदलले तरी समस्या ‘जैसे थे’च राहणार असून, फक्त टक्केवारी घेणे, बिले काढणे आणि विकासाच्या नावाने पत्रकबाजी करणे एवढीच कामे सत्ताधारी करू शकतात, असा आरोप शिवसेनेने केला.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देवीदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, महिला संघटिका हेमा हेमाडे, डॉ. जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, संदीप सूर्यवंशी, अण्णा फुलपगारे, पुरुषोत्तम जाधव, रवी माळी, विनोद जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वकील संघालाही आश्वासनच
शहरातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी महापालिकेकडून चार वर्षांत धुळेकरांना केवळ तारीख पे तारीख देण्याचे काम सुरू आहे. वकील संघाला दिलेला ४५ दिवसांचा अल्टिमेटम संपून ६० दिवस लोटले तरी ढिम्म प्रशासन जागे झाले नाही, वकील संघालाही उल्लू बनविले. यापुढे धुळेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना आंदोलनातून प्रशासनाला जागे करेल व त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेप्रश्नी संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शिवसेनेने दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.