नाशिक ः सुजाण नागरिक मंचतर्फे गंगापूर रोडवरील जेहान सर्कल भागात "माणुसकीची भिंत' उपक्रम राबवण्यास सुरवात केली असून त्याचा शुभारंभ "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या हस्ते झाला. "नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा' अशा संकल्पनेवर आधारित उपक्रमातंर्गत ख्रिसमस सणादिवशी वापरात नसलेले कपडे गरजूंना देत आनंद लुटला.
क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी मंचच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच उपक्रमाचा विस्तार करावा, असेही त्यांनी सूचवले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक शिवाजीराव गांगुर्डे, प्रेरणा बेळे, उद्योजक धनंजय बेळे, "निमा'चे मानद सरचिटणीस डॉ. उदय खरोटे, मंचचे अध्यक्ष मनोहर देशपांडे, सचिव गिरीश पगारे, खजिनदार जगदीश फडके, मधुकर बागूल, धर्मादाय उपायुक्तालयातील अधीक्षक संजय महाजन, आप्पासाहेब उपासनी आदी उपस्थित होते.
पिशव्या भरुन आलेत कपडे
उपक्रमाच्या शुभारंभाला परिसरातील रहिवाश्यांनी पिशव्या भरुन कपडे आणले होते. पुरुष आणि महिला व मुले अशा स्वरुपात हे कपडे ठेवण्यात आले. याठिकाणाहून आपल्याला आवश्यक असलेले कपडे गरजू घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसांडून वाहणारा आनंद उपस्थितांना प्रोत्साहन देत होता. मंचतर्फे भूमिका स्पष्ट करताना श्री. पगारे यांनी "माणुसकीची भिंत' हा उपक्रम शहराच्या इतर भागामध्ये राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की समाजामध्ये तीन प्रकारचे लोक असतात. एखादी समस्या निमूटपणे सहन करणारे, केवळ तक्रार करणारे आणि समस्येबाबत सकारात्मक विचार करुन सोडवणारे असे हे प्रकार आहेत. तक्रार करणाऱ्यांना समस्या सोडवणाऱ्यांमध्ये बदलणे आवश्यक आहे. त्यातून जागरुकांची संख्या वाढून समाजात आमुलाग्र बदल होऊ शकेल. याच तत्वावर कामटवाड्यामध्ये सुजाण नागरिक मंच काम करत आहे. शनिवारी सुटी असल्यावर सकाळी सहाला उठून "इनोव्हेटीव्ह' शिटी अभियान सुरु होते. शिटी ऐकल्यावर प्रत्येक इमारत, अपार्टमेंटमधील रहिवाशी खाली येऊन स्वच्छतेला सुरवात करतात. कुणावरही टीका अथवा कसलीही बंधन न पाळता कामाची ही धडपड सुरु आहे.
|