
भाजपच्या विजयामुळं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाची स्थिती मजबूत झालीय.
5 राज्यांच्या निकालांचा थेट राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर परिणाम!
नवी दिल्ली : पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Election) भाजपच्या (BJP) विजयामुळं या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election India) पक्षाची स्थिती मजबूत झालीय. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, उत्तर प्रदेशमधील भाजपच्या मोठ्या विजयामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा 'उत्तराधिकारी' ठरवण्याची सोय झालीय. कोविंद यांचा 24 जुलै 2022 रोजी कार्यकाळ संपत आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) बाजूनं गेले असते, तर भाजपला बिजू जनता दल (BJD), तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), वायएसआर काँग्रेस पार्टी (YSRCP) या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावं लागलं असतं. मात्र, याची भाजपला जास्त गरज भासणार नाहीय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानमंडळांचे निवडून आलेले सदस्य, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पाॅंडिचेरीचा समावेश होतो.
हेही वाचा: 'आप' राष्ट्रीय पक्ष होणार? पक्षाला करावी लागणार आयोगाची 'ही' अट पूर्ण
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला मत दिलं जातं?
विधान परिषद सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपती निवडणुकीसाठी निवडणूक मंडळाचा भाग नसतात. लोकसभेचे माजी सरचिटणीस पी श्रीधरन (P Sreedharan) यांनी पीटीआयला सांगितलं की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता एनडीएला फायदा झालाय. राष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यसभा 233 सदस्य, लोकसभा 543 सदस्य आणि विधानसभेचे 4,120 सदस्य असं एकूण 4,896 मतदार आहेत. प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य 708 इतकं निश्चित करण्यात आलंय, तर राज्यांमध्ये आमदारांच्या मताचं कमाल मूल्य 208 आहे. उत्तर प्रदेश विधानसभेतील एकूण मतांचं मूल्य 83,824, पंजाब 13,572, उत्तराखंड 4480, गोवा 800 आणि मणिपूर 1080 आहे. यामुळंच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील विजयामुळं भाजपसाठी राष्ट्रपतीपदाची निवडणूक सोपी झालीय.
हेही वाचा: मुस्लिम बहुल भागात कोणाचं 'गणित' चुकलं; सपापेक्षा भाजप का ठरली सरस!
राष्ट्रपती पदासाठी निवडणूक कशी होते?
भारतातील राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रतिनिधित्व प्रणालीचं पालन करून केली जाते. 1971 च्या जनगणनेच्या आधारे प्रत्येक मताचं मूल्य संबंधित राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पूर्वनिश्चित केलं जातं. अध्यक्षाच्या निवडणुकीत 4,896 मतदार असलेल्या मंडळाचं एकूण मूल्य 10,98,903 आहे. अध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराला एकूण मतांच्या किमान 50 टक्के + 1 मतं मिळणं आवश्यक आहे.
Web Title: Up Punjab Uttarakhand Goa Manipur Election Results Bjp Will Benefit In The Presidential Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..