नागपूर: बोले पेट्रोल पम्पवरील लाईव्ह हत्याकांडात आणखी एक ट् वीस्ट आला असून आरोपी चेतन हजारेने बाल्या बिनेकरचा मर्डर केल्यानंतर अश्विन तुरकेलचा मर्डर करण्याची योजना आखली होती.
बापाच्या खूनाच्या बदल्यासह तो मित्राच्या खुनाचाही बदला घेणार होता. मात्र गाडी चालू न झाल्यामुळे त्याची योजना यशस्वी झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. आज चारही आरोपींना न्यायालयाने पाच ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सूत्रांच्या माहितीनुसार, फेब्रूवारी २०१५ मध्ये अश्विन तुरकेल आणि निखिल डागोरने धरमपेठमध्ये रितेश बैसवारेची हत्या केली होती. चेतम आणि रितेश यांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे चेतनने वडीलासह मित्राच्या खुनाचा बदला घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे दुपारी बोले पेट्रोल पम्पजवळ बाल्या बिनेकरचा मर्डर केल्यानंतर अश्वीनचाही घरात घुसून गेम करण्याचा कट रचण्यात आला होता.
बाल्यावर चाकूने हल्ला करून ठार केल्यानंतर बाल्याची कार घेऊन पळून जाण्याचे चेतन आणि आरोपींनी ठरविले होते. ते सर्व थेट अश्विन तुरकेलच्या एरीयात जाणार होते. मात्र बाल्याची कार वेळेवर सुरू झाली नाही. त्यामुळे त्यांना बाईकने पळून जावे लागले.
चेतन हजारे आणि असिम लुडेरकर हे दोघे दुचाकीने खामल्यातील तोंजू नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याकडे गेले होते. त्याच्यामार्फत ते रात्रीला पेश होणार होते. त्या कार्यकर्ताने एका अधिकाऱ्याला ऑफरसुध्दा दिली होती. मात्र त्या अधिकाऱ्याने तोंजूला फटकारले आणि आरोपीला सहकार्य केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी तंबी दिली. त्यामुळे त्याने हात आवरता घेतल्याची चर्चा आहे.
बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपी अंकित उर्फ अभिषेक माथनवार हा अद्याप फरार आहे. तो पोलिसांना गुंगारा देण्यात पटाईत आहे. त्याच्यावर कळमण्यात लुटमार आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कळमन्यातील गुन्ह्यात फरार असतानाच तो हत्याकांडात सहभागी झाला होता. अंकितच बाल्याची गेल्या १५ दिवसांपासून रेकी करीत होता.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.