पेट्रोलबरोबर आता साखरही भडकणार; कारखानदारांचा फायदा तर सामान्यांवर बोझा

Along with petrol and sugar prices will now go up
Along with petrol and sugar prices will now go up

नागपूर : साखर, तेल, डाळी, धान्ये, भाजीपाला, फळे ही सर्वांसाठी दैनंदिन गरज आहे. दररोज ताटात येणाऱ्या या खाद्यपदार्थांचे दर वाढले की सामान्यांच्या नाकीनऊ येते. आधीच पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले असताना आता केंद्र सरकारच्या धोरणामुळे साखरेचेही भाव वाढण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी १७ लाख टन साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात साखरेच्या कोट्यात कपात केली आहे. जानेवारी २०२१ या महिन्यात २० लाख टन साखर विक्रीच्या कोट्याला मंजुरी दिली होती. मात्र, आता फेब्रुवारी महिन्यात या तुलनेत ३ लाख टन कमी साखर विक्री केली जाणार आहे. त्यामुळे कारखानदारांना दिलासा मिळालेला आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर कोट्यात कपात करताच दोनच दिवसात प्रति किलो ५० पैशांनी साखर वाढली आहे. पुढील काही दिवसात मागणी वाढल्यास भाव वाढीचे संकेतही मिळू लागले आहे.

सरकारने गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२० या महिन्यातही २० लाख टन साखर कोटा मंजूर केला होता. यंदा कोटा कमी केल्याने साखरेच्या दरात किंचित वाढ झालेली आहे. १७ लाख टन साखरेचा कोटा ५४८ कारखान्यांना विभागून दिला आहे. दोन महिन्यांच्या तुलनेत कोट्यात घट केलेली आहे. इतके असूनही साखर विक्री होत नसल्याने साखर विक्रीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अजूनही शीतपेय उत्पादकांकडून साखरेची मागणी नोंदविण्यात आलेली नाही. त्यामुळे साखर कारखानदारांसमोर बल्कमध्ये साखर विक्रीची समस्या उभी ठाकली आहे.

गेल्यावर्षी आणि या महिन्याच्या तुलनेत साखर कोटा कमी मंजूर केला आहे. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण राहील. साखरेची किंमत ३० रुपयांवरून ५० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे, असेही तज्ज्ञांना वाटते. दरम्यान, केंद्र सरकारने साखरेच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे आणि साखरेच्या दरात स्थिरता आणण्यासाठी साखर विक्रीचा मासिक कोटा पद्धत लागू केली असल्याचेही बोलले जात आहे.

गेल्या आठवड्यात साखर ३३०० ते ३४५० रुपये प्रति क्विंटल होती. त्यात प्रति क्विंटल ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे साखर ३३५०-३५०० रुपये क्विंटलवर पोहोचली आहे, असे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. तसेच डाळी, तेल, तांदूळ, गव्हाचे भाव स्थिरावलेले आहेत.

साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’

कोटा कमी असल्याने बाजारात काही प्रमाणात सकारात्मक वातावरण राहील अशी अपेक्षा साखर उद्योगाची आहे. यंदाचा हंगाम सुरू होऊन चार महिने झालेले आहेत. साखरेचे उत्पादनही अतिशय संथ गतीने होत असल्याने चिंतेत भर पडलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत साखरचे किमान विक्री मृल्य वाढविल्याशिवाय बाजारात तेजीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने साखरेच्या कोट्यात केलेली घट आणि फेब्रुवारीत उन्हाळ्याची चाहूल कारखानदारांना साखर विक्रीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काळात साखरेचे भाव वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com