"मुख्यमंत्र्यांचे आदेश शिवसेनेच्या मंत्र्यांना पटले नसावेत म्हणूनच गर्दी झाली"

आता विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  
आता विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  

नागपूर ः राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.  आपल्या २६ मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी जनतेला कोरोनाचे सर्व नियम पळून गर्दी न करण्याचं आवाहन केलं. मात्र त्यांच्याच एका मोठ्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी हे नियम अक्षरशः पायदळी तुडवले. याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा संजय राठोड यांनी अपमान केला. तरीही कालपासून मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलत नाहीये. याचा काय अर्थ घ्यावा? मुख्यमंत्र्यांनी राठोडांना गर्दी जमवण्यासाठी परवानगी दिली होती का, याचे उत्तर त्यांनी द्यावे. परवानगी दिली असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला तसे सांगावे, नाहीतर मंत्री राठोडांवर कारवाई केली पाहिजे. पण यावर ते काही बोलत नाहीत. पोलिसांनी काल सांगितले की, गर्दी करणाऱ्या १० हजार लोकांवर आम्ही गुन्हे दाखल करू. पण त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये. कारण मंत्री तेथे गेले नसते तर लोकही गेले नसते. त्यामुळे कारवाई मंत्री राठोड यांच्यावर झाली पाहिजे. राज्य सरकारने आता लपाछपीचा खेळ बंद केला पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

जनतेने कसे वागले पाहिजे, नियमांचे पालन कसे केले पाहिजे, याबद्दल विस्तृत संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. कोरोनाचे नियम पाळण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले. यामध्ये जनतेने कसे वागले पाहिजे. राजकीय पक्षांनी काय केले पाहिजे. विरोधी पक्षाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, हे सांगितले. आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यांना प्रतिसाद दिला आणि आमचे नियोजित जेलभरो आंदोलन पुढे ढकलले. मात्र त्यांचा हा संदेश वनमंत्री संजय राठोड यांना पटला नसावा. म्हणून त्यांनी काल वाशीम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे दर्शनाच्या नावावर शक्तिप्रदर्शन केले असंही ते म्हणाले. 

तेथे हजारो लोकांनी गर्दी केली होती. गर्दीतील १० हजार लोकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले. पण गर्दीतील लोकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा ज्या मंत्र्यांमुळे तेथे गर्दी झाली त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल केले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

राठोडांना वाचवण्याचा प्रयत्न 

काल पोहरादेवी येथे दाखवण्यात आलेले शक्तिप्रदर्शन म्हणजे राठोडांना वाचवण्याची प्रक्रिया आहे. तसं पाहिलं तर नैतिक जबाबदारी स्वीकारून संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी तो राज्यपालांकडे पाठवायला पाहिजे होता. पण यांच्याकडे नैतिकताच शिल्लक राहिली नाहीये. नैतिकतेच्या बाता करणारे सर्व विसरले आहेत. त्यामुळे राज्यात अशी प्रकरणं होत असल्याचा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com