दिवसाला 20 तर 1530व्या शेतक-याचा नंबर कधी लागेल सांगा बरं...

file
file

पारशिवनी (जि.नागपूर) : आसमानी, सुलतानी संकटातून कसाबसा बचावलेला शेतकरी आता लॉकडाउनच्या कचाट्यात सापडल्याने तसेच शासनाच्या धोरणाचा फटका बसत असल्याने मरणाच्या दारात लोटला जात आहे. कासवगतीने सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेत दररोज केवळ 20 शेतकऱ्यांनाच संधी मिळत असल्यामुळे नोंदणी झालेल्या 1530 शेतकऱ्यांचा नंबर कधी लागेल, याविषयी कुणीच बोलायला तयार नाही.

जिल्ह्यात तीन मंत्री असताना शेतकऱ्यांचे हाल
राज्य सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन मातब्बर मंत्री असून शेतकऱ्यांकडील कापूस विकला न गेल्याने शेतकऱ्यांना मरणाच्या वाटेवर आणून सोडले की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे कारण पुढे करून 20 शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघ खरेदी करीत आहे. तर 1530 शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. दरवषीं 15 मेपर्यंतच कापूस खरेदी करण्याची परंपरा आहे. चालू महिना संपत आला असून पुढील मे महिन्यात 15 दिवसांत तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा कापूस कसा खरेदी करणार, अशी बिकट परिस्थिती असताना मात्र पालकमंत्री, क्रीडामंत्री, गृहमंत्री व डझनभर आमदार असताना शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची परिस्थिती येणार असेल तर मात्र शेतकऱ्याप्रती नेते मंडळी किती गंभीर आहेत, हे दिसून येते.


दिवस कमी, कापूस जास्त
सावनेर तालुक्‍यतील खैरी या खासगी कापूस केंद्रावर दररोज 100च्या गाड्यांच्यावर शेतकऱ्यांचा कापूस 4200 रुपये ते 4800 रुपये प्रतिक्‍विंटल या दराने घेतला जात आहे. मात्र, सरकारी कापूस केंद्रावर 20 शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात असल्याने तालुक्‍यातील हजारो शेतकरी कापूस विकणार कसा? "दिवस कमी कापूस जास्त' अशी स्थिती असल्याने कापूस खरेदी होणार की नाही, या चिंतेत रोज शेतकरी कापूस केंद्रावर हजेरी लावत आहेत. 24 एप्रिलपर्यंत मात्र 868 क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

किमान 50 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करा !
पालकमंत्री या क्षेत्रात ढुंकूनही पाहण्यास तयार नाहीत. नियोजन नसल्याने शेतकरी कापूस कसा विकणार? त्यासाठी सरकारी कापूस खरेदी केंद्रावर 50 शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी करावा तरच संपूर्ण शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करता येईल. त्यासाठी शासनाने कापूस केंद्रावर मजुरांची संख्या वाढवून लवकरात लवकर शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सरकारकडे तशी मागणी करणार
प्रत्येक शेतकऱ्याचा कापूस खरेदी करावा, तेही पावसाळा सुरू होण्याआधी. त्यासाठी मी जिल्हाधिकारी यांच्याकडे मुदत वाढविण्यासाठी दररोज 50 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी मागणी करणार आहे.
ऍड. आशीष जयस्वाल
आमदार, रामटेक

तोपर्यंत खरेदी सुरू ठेवा !
पारशिवनी तालुक्‍यातील कापूस हा पणन महासंघाने पावसाळ्यापूवी खरेदी करावा. 20 शेतकऱ्यांऐवजी 50 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा. तसेच जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होणार नाही, तोपर्यंत खरेदी सुरू ठेवावी. यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याकरिता प्रयत्न केला जात आहे.
उदयसिंह यादव
कॉंग्रेस नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com