नागपूर ः किसान रेल्वे नागपूर विभागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. या ट्रेनद्वारे दिल्लीला १ हजार ७२५ टन संत्रा पाठविण्यात आला. कोलकात्यालाही १६६ टन संत्रा पाठविण्यात आला आहे. कोलकात्यासह दिल्लीतील नागरिकांना नागपुरी संत्र्याची आंबटगोड चव चांगलीच भावली असून मागणीत उतरोत्तर वाढ होत आहे.
नागपुरी संत्र्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रेल्वेने पुढाकार घेतला आहे. देशाच्या विविध भागांमध्ये संत्रा पोहोचविण्याची व्यवस्था किसान रेल्वेच्या माध्यातून करण्यात येत आहे. मालवाहतूकीच्या भाड्यात ५० टक्के अनुदानासह कमी विळेत संत्र्यांची सुरक्षित वाहतूक केली जात आहे.
ताजे आणि दर्जेदार संत्र्यांना दरही चांगले मिळूलागल्याने शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. १४ ऑक्टोबर रोजी नागपूरहून संत्र्याची पहिली खेप दिल्लीला पाठविण्यात आली होते. तेव्हापासून २६ नोव्हेंबरपर्यंत एकूण १ हजार ७२५ टन संत्री पाठविण्यात आली आहे. सोबतच नागपूरहून शालीमारला (कोलकाता) दोन फेऱ्या पाठविण्यात आल्या. त्यातून १६६.४ टन संत्री पाठविण्यात आली.
यातून रेल्वेला ५५.५० लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. नागपूरहून १४४.१४८ टन, लगतच्या कळमेश्वरहून २४.२३ टन, काटोलहून १४६ टन, नरखेडहून ११९.८ टन, वरूडहून ८४०.७६ टन, पांढुर्णाहून ५९३.३५ टन संत्री लोड करण्यात आली. देशातील एकूण संत्रा उत्पादनात महाराष्ट्राचा ४० टक्के वाटा आहे. म्हणूनच नागपूरची संपूर्ण जगात ऑरेंज सिटी अशी ओळख आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने संत्रा वाहतुकीत मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा लाभ मिळू लागला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.