साहेबऽऽ कोरोनामुळे नंतर मृत्यू येईल; भुकेमुळे आधीच मृत्यू येण्याची भीती; हातावरच्या पोटाला पुन्हा बसणार चटके

Due to the lockdown there will be a time of starvation for the workers laborers and tea vendors
Due to the lockdown there will be a time of starvation for the workers laborers and tea vendors

नागपूर : कोरोना विषाणूमुळे वर्षभर गरिबांचे जगणे कठीण झाले होते. किलोभर पीठ आणि पावभर तांदूळ विकत घेण्याची वेळ आली होती. आता कसंबसं हातावरच्या पोटात दोन घास जात असताना पुन्हा एकदा शहरात लॉकडाउनची घोषणा झाली. यामुळे पुन्हा एकदा हातावरचे पोट चिंतेत आले आले. कुटुंबाचा गाढा ओढायचा कसा ही चिंता आजपासूनच सतावत आहे. कोरोना नंतर जीव घेईल पण आधी भुकेने व्याकूळ झाल्यानंतर होणाऱ्या वेदनानींच मरण्याची वेळ गरिबांवर येणार आहे. ही व्यथा आहे, शहरातील ठिय्या कामगार, पानठेले, चहा टपऱ्यांवर आयुष्य जगणाऱ्या गरिबांची. त्यांनी ‘सकाळ’ जवळ आपली व्यथा मांडली.

उत्तम हुमणेंचा सीताबर्डी परिसरात पानठेला आहे. नुकतेच पोराचं लग्न केलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. कर्ज उतरवण्यासाठी पानठेला चालविण्यापासून तर जमेल ते काम करण्यासाठी हात पुढे करतो. दिवसभराच्या व्यवसायानंतर हातात आलेल्या पैशातून जगण्यासोबतच कर्ज चुकवण्यास मदत होते. परंतु वर्षभरापासून कोरोनाची आणीबाणी, लॉकडाउन, संचारबंदी अशा विळख्यात आमचे पोट सापडले. पानठेल्याचा कुटुंबाला कसातरी आधार होता. मात्र विकण्यासाठी आणलेली पाने पार सुकून जातात. कोरोनाने आमच्या जगण्यातील दाहकता वाढली, असे सांगताना उत्तम हुमणे यांचे डोळे पाणावले. 

संजय राउरे म्हणाला, देवाच्या आधाराने फुलं विकण्याचा व्यवसाय करून ‘रस्त्यावरचे आयुष्य’ जगतो. हारतुरे विकले की, दोन वेळचे पोट कसंबसं भरते. मात्र पुन्हा लॉकडाउनने जगण्याची चिंता लागली आहे. भरला संसार असून या साऱ्यांचा जगण्याचा आधार हे फुलांचे दुकान आहे. मात्र लॉकडाउनमुळे दिवसभरात एकही हार विकला जात नाही. कुटुंबावर पुन्हा उपासमारीची पाळी येण्याची भीती आहे. एक किलो पीठ आणि पावभर तांदूळ उधारीवर घेण्याची वेळ पुन्हा एकदा येईल, अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

‘त्या’ आठवणींनी डोक्यात आग भडकते

लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या ठिय्यावरील स्थलांतरित कामगारांचे प्रचंड हाल झाले होते. रोजगारच नसल्याने स्थलांतरित कामगारांनी पायीच घराचा रस्ता धरला. यामध्ये अनेक कामगारांना रस्त्यातच जीव गमवावा लागला. सोबतच्या मजुराचा मृत्यू रेल्वेलाईनवर घरी जात असताना झाल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

त्या आठवणी आठवल्या की, डोक्यात आग भडकते. साहेब, कोरोनामुळे नंतर मृत्यू येईल, भूकेमुळे त्याआधीच मृत्यू येण्याची भीती आहे. गरिबांवर भुकेने तडफडून मरण्याची पाळी या लॉकडाउनमुळे पुन्हा आली आहे. हे अधिकारी, आमदार, मंत्री निव्वळ एसीत बसून निर्णय घेतात. गरिबांच्या जगण्याची त्यांना चिंता नसते, असेही ठिय्यावरील प्रजापती म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com