पशुपालकांनो सावधान... ही वनस्पती खाल्ल्याने जातो जनावरांचा जीव

हिंगणा : जनावरांच्या जीवावर उठलेली ढोरकाकडा वनस्पती.
हिंगणा : जनावरांच्या जीवावर उठलेली ढोरकाकडा वनस्पती.

हिंगणा (जि. नागपूर) : कपाशीच्या शेतात ढोरकाकडा तणवनस्पती खाल्लेल्या जनावरांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना कान्होलीबारा व परिसरात घडली. ही वनस्पती खाल्ल्याने जनावरांची लघवीच बंद झाल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुसंवर्धन विभागाचे पथक तातडीने गावात दाखल झाले असून, जनावरे तसेच पिकांची पाहणी सुरू आहे.

हिंगणा तालुक्‍यात कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कपाशीचे पीक बहुतांश शेतामधून काढण्यात आले आहे. या शेतात पहिल्यांदाच ढोरकाकडा ही तण वनस्पती आढळली.

ढोरकाकडा ही वनस्पती जनावरांच्या जीवावर उठणारी आहे. त्यामुळे पशुपालकांनी सावधान राहण्याची गरज आहे. कपाशीच्या शेतात ही वनस्पती वाढत असल्याने तिचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. कान्होलीबारा, आमगाव व खडकी परिसरातील शेतात काही जनावरांनी ढोरकाकडा वनस्पती खाल्ली. वनस्पतीच्या सेवनानंतर जनावरांच्या लघवीच्या पिशव्या फुगल्या. त्यामुले जनावरांचा मृत्यू झाला.

पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासणी

कान्होलीबारा येथे महाशिवरात्रीच्या दिवशी मृत जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. या घटनेची माहिती पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन विभागातील उपायुक्त डॉ. मंजूषा पुंडलिक, सहआयुक्त डॉ. भूगावकर, सहआयुक्त प्रादेशिक रोग अन्वेषण प्रयोगशाळा डॉ. टोपले, पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋचा लांजेवार, डॉ. अश्विनी गडगडे, श्री. राऊत उपस्थित होते.

पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण

जनावराचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. याचा अहवाल प्रादेशिक रोग अन्वेषण प्रयोगशाळेमार्फत देण्यात येईल. मात्र, पशुधन विभागातील अधिकाऱ्यांनी ढोरकाकडा वनस्पती खाल्ल्याने जनावरांमध्ये आजार पसरल्याचे प्रथमदर्शनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य अतीश उमरे, पंचायत समिती सदस्य संजय ढोढरे, सरपंच जितेंद्र बोडरे उपस्थित होते. वनस्पती खाल्ल्याने होणाऱ्या या नवीन आजारामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच यातील कारण स्पष्ट होणार आहे.

जनावरांना चुन्याची निवळी द्यावी
पशुपालकांनी जनावरांना कपाशीच्या शेतातील ढोरकाकडा तणवनस्पती खाण्यापासून रोखावे. जर तिचे सेवन केले असेल तर प्रथमोपचार म्हणून जनावरांना चुन्याची निवळी द्यावी. निवळीसाठी अंदाजे एक किलो चुना पाच लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवून ते पाणी जनावरांना पाजावे.
- डॉ. ऋचा लांजेवार, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, हिंगणा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com