शेतकऱ्यांनी दिले सोयाबीन पिकाला प्राधान्य; मात्र, अतिवृष्टी व किडीमुळे पीकच गेले हातातून

Farmers Diwali in darkness due to insects
Farmers Diwali in darkness due to insects

नागपूर : यंदा सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. अतिवृष्टी आणि किडीमुळे संपूर्ण पीकच हातातून गेले. नागपूर जिल्ह्यात ६८ हजार ९६८ हेक्टरमधील सोयाबीन पीक किडीने फस्त केले.

मागील वर्षीचा अनुभव पाहता यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. परंतु, यंदाही त्यांच्या पदरी निराशाच आली. सततच्या पावसाने शेतात पाणी जमा राहिले. यामुळे सोयाबीन किडीचा प्रादुर्भाव झाला. सोयाबीनची पाने पिवळी पडली. काही ठिकाणी सोयाबीनमधील दाणा भरला नसून ते काळे पडले. हाती काही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी कापणीच टाळली.

शेतातील सोयाबीन न कापता त्यावर थेट ट्रॅक्टर चालवले. काहींनी रोटावेटर मारला. त्यामुळे यंदाही शेतीचा व्यवसाय तोट्याचा ठरला. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात ६८ हजार ९६८.२५ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड झाली. या संपूर्ण क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यामुळे ९१ हजार ५१३ शेतकरी बाधित झाले असून, ४६ कोटी ८९ लाख ८४ हजार १०० रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून शासनास मदतीसाठी पाठविण्यात आला.

९,७२१ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान

किडीमुळे सोयाबीनसोबत संत्रा आणि मोसंबी या फळपिकांची हाणी झाली. ९७२१.११ हेक्टरमधील फळपिके हातची गेली. यात २६३६.१९ हेक्टर संत्रा तर ७०८५.०१ हेक्टर मोसंबीचा समावेश आहे. १८,१४८ शेतकरी यामुळे बाधित झाले असून, त्यांना मदतीसाठी १७ कोटी ४९ लाख ७९ हजार ९८० रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com