नागपूर जिल्हयाच्या ग्रामीण भागात फोफावतोय कोरोना, ही आहेत त्यामागची कारणे...

file
file

जलालखेडा(जि.नागपूर): नरखेड तालुक्यातील मोवाड शेजारील पांढरी गायमुख येथे तेरवीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला शेकडोंची उपस्थिती होती. त्यात नागपूर येथील एक जावईही होता. तो केवळ तेरवितच नव्हे तर त्याने अनेकांच्या घरी उपस्थिती लावली. पण तो कोरोनाबाधित निघाल्यामुळे त्याच्या संपर्काने त्या कुटुंबासह मोवाड व पांढरी गायमुख येथील त्यांचे अनेक नातलग कोरोनाबाधित झाले. अशात एका वृद्धाचा मृत्यूही झाला. हे सगळे घडले कशामुळे? तर एका कुटुंबाने शासनाने लादलेल्या निर्बंधांचे पालन न करण्यामुळे घडले. आहे की नाही चिंतनिय बाब !

बिनधास्त सुरु आहेत सामूहिक सोहळे
सुरवातीला शहरी भागापूरताच मर्यादित असलेला कोरोना व्हायरस संक्रमणाचा धोका ग्रामीण भागातही वाढला आहे. लॉकडाउन अनलॉक झाल्यानंतर ग्रामीण भागात सामूहिक सोहळे व इतर सामाजिक कार्यक्रमांना सुरवात झाली. यात लग्न, साक्षगंध, तेरवी, चौदावी, अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमाचा समावेश आहे. याकरिता प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. पण काही परवागनी घेतात, तर काही विना परवानगीने कार्यक्रम पार पडतात. कार्यक्रमाकरिता परिस्थिती बघून ५० लोकांपर्यंत उपस्थित राहण्याचे शासनाने ठरवून दिले आहे. प्रशासन ग्रामीण भागात शासनाने ठरविलेल्या निर्बंधाचे पालन करण्याच्या अटीवर २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देते. परंतू परवानगी दिल्यानंतर त्यावर देखरेख करण्याकरिता कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे कार्यक्रमाला शेकडोंनी उपस्थिती राहत आहे. यामुळे नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा धोकाच निर्माण झाला नाही, तर रुग्णसंख्येतही कमालीची वाढ झाली आहे.

निर्बंध तोडणाऱ्यावर कारवाईची कुठेही नोंद नाही
ग्रामीण भागात असे कार्यक्रम गावोगावी सुरू आहेत, परंतू प्रशासन व पोलिस विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागात महसूल विभागाचा तलाठी, ग्रामविकास यंत्रणेचा ग्रामसेवक व पोलिस विभागाचे पोलिस पाटील हे प्रशासनाचे महत्वाचे घटक आहेत. पोलिस पाटील सोडले तर एकही तलाठी किंवा ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही. शासनाचे कोणतेही काम, योजना या प्रशासनाच्या तीन घटकामार्फत होते. महसूल विभागाकडून कार्यक्रमाची परवानगी मिळाल्यानंतर त्यावर देखरेख करणे ग्रामसेवक, तलाठी व पोलिस पाटील यांच्याकडून अपेक्षित आहे. परंतू असे होत नाही. निर्बंध तोडणाऱ्यावर कारवाई झाल्याची कुठे नोंद नाही.

पोलिस यंत्रणाही ढेपाळली
ग्रामीण यंत्रणेत फक्त आरोग्य विभाग सक्रिय असल्याचे चित्र आहे. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर काही काळ पोलिस यंत्रणा खूप सक्रिय होती, परंतू गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस यंत्रणाही ढेपाळली आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या कार्यक्रमावर जर प्रशासनाने वेळीच निर्बंध लावले नाही, कारवाई केली नाही तर आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरिता लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व जनतेच्या सहभागाने जनजागृती करणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना व्हायरस ग्रामीण जनतेलाही आपल्या विळख्यात घेण्यास वेळ करणार नाही.

संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com