
नागपूर : ती म्हातारी जख्ख... असेल सत्तरी पार केलेली... हाती अन्नाचं पाकीट देणाऱ्याला डोळ्यात पाणी आणून विचारत होती... "दादा हा कोणता रोग हाय...? ज्यानं लोकायले घरातच डांबलं. लोकच घराबाहेर पडले नाही तर आमी जगाव कसं...? भीक मागून खातो आमी... अन् आता तर सगळेच घरांमधी आहेत... आमी तर मरणारच आता...' म्हातारीच्या प्रश्नानं भिकारी आणि बेघरांचं उघड जगणं अधिक नागड झालं आहे. कोरोनाचा डंख त्यांच्यापर्यंतही पोहोचला आहे.
लॉकडाउनचा मोठा फटका मजूर वर्गाला बसला आहे. रोजगारांची चाकेच थांबल्याने वाडी-वस्ती आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कितीतरी झोपड्यांमधील चूली विझल्या. अगोदरच जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मजुरांना टाळेबंदीने "याचक' करून सोडलेयं. हाती कामच नसल्याने हे मजूर दरदिवशी "अन्नाच्या पाकिटांची' डोळ्यात प्राण आणून वाट पाहतात. सुरुवातीच्या 21 दिवसात मजुरांसाठी समाजात दातृत्वाचे झरे झिरपलेही. मात्र, लॉकडाउनचा दुसरा टप्पा आता 19 दिवस वाढला आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला आणि मंदिरे, बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागणारे आणि बेघर असणाऱ्यांचे दुर्लक्षित जगणेही समाजाच्या पटलावर ठळकपणे उमटू लागले आहेत.
मजुरांना अन्नदान करण्याचे रतिब सध्या सुरू आहे. सोशल माध्यमांवर अशा दातृत्वाच्या "साखळ्या' जोडल्या जात आहेत. मजुरांच्या किमान दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटली असली तरी टाळेबंदीमुळे रिकाम्या झालेल्या शहरांमध्ये भिकारी आणि बेघर असणारे डोळ्यांपुढे ठळकपणे दिसू लागले आहेत. टाळेबंदीने त्यांचे भीक मागण्याचे स्वातंत्र्यही हिसकावले आहे. खरं तर त्यांचं जगणचं उसवलं गेलं आहे. नातेवाईक आणि कुटुंबांनी नाकारलेली ही माणसं भीक मागून गुजराण करतात. काही भीक मागण्यासोबत छोट्या-मोठ्या वस्तूंही विकतात.
मंदिरे, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक गर्दीचे ठिकाणं म्हणजे भिकाऱ्यांच्या "रोजीरोटीची' केंद्रेचं. मात्र, टाळेबंदीने त्यांचा हा आधारच निखळला आहे. ऐरवी जगरहाटीत आणि जगण्याच्या धावपळीत अडगळीत असणाऱ्या भिकारी आणि बेघरांचे विश्व पुरते "उघडे' झाले आहे. रेल्वे प्रवासात व इतर सार्वजनिक ठिकाणी हात पुढे करून आयुष्य रेटणाऱ्या "तृतीय पंथीयांना' देखील टाळेबंदीने जखडून ठेवलेयं. त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आला आहे. ऐरवी दारोदारी जाणारे भिकारी टाळेबंदीच्या साखळीने जखडले गेले आहे. कोरोनाचा अर्लट म्हणून जिथे सगेसोयऱ्यांना "प्रवेश' नाकारला जातोयं. तिथे भिकाऱ्यांना अन्न देण्यासाठी पूर्वीसारखेच हात पुढे येतील का? हा कळीचा प्रश्न उभा राहिला आहे.
दोन घास पोहरेचलेच पाहिजे
भिकारी आणि बेघरांचे प्रश्न लॉकडाउनमुळे खऱ्या अर्थाने शासन, लोकप्रतिनिधी आणि समाजासमोर आले आहेत. दानशूर व्यक्ती व समाजाने भिकारी आणि बेघरांसाठीही आपली संवेदना जागृक करावी. लॉकडाउनचा हा टप्पा सर्वांची कसोटी घेणारा असला तरी, भुकेने व्याकुळ असणाऱ्या प्रत्येकाच्या मुखापर्यंत दोन घास पोहरेचलेच पाहिजेत.
- दत्ता शिर्के,
सामजिक कार्यकर्ते, युवा चेतना मंच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.