नागपूर : शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू करण्यावर मंथन होत असताना, आरटीई प्रवेशाबाबत सरकारचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहण्यास आरटीईमधील विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर प्रक्रियेतील सोडत 17 मार्चला काढण्यात आली. आरटीई प्रवेशासाठी राज्यातून 1 लाख 920 पाल्यांची निवड करण्यात आली आहे. 75 हजार 465 पाल्य प्रतीक्षा यादीत आहेत. नागपूरमधून 6 हजार 784 जागांसाठी 31 हजार 44 पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 6 हजार 685 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 17 मार्चला सोडत निघाल्यावर 21 मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.
दुसरीकडे सीबीएसई आणि काही नामवंत खासगी इंग्रजी शाळांमार्फत पालकांना संदेश पाठवून 20 मेपर्यंत प्रवेशाचा हप्ता भरण्याची सूचना केली आहे. या प्रकाराने नेमका कुठे प्रवेश घ्यायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे पालकांसमोर दुहेरी पेच पडला आहे. तेव्हा आरटीई प्रक्रियेबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.