नागपूर : वयात येणाऱ्या (13 ते 17) मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी 90 टक्के मुली प्रेमप्रकरणातून घर सोडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुलाबी स्वप्न बघून भविष्याचा कोणताही विचार न करता प्रियकरासोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. चार वर्षांत तब्बल 1,241 अल्पवयीन मुलींची अचानक बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अल्पवयीन मुलांसह महिला व पुरुषांच्याही बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बहुतेक प्रकरणात प्रेमप्रकरण आणि विवाहबाह्य संबंध असल्यामुळे पळून गेल्याचे समोर आले. भविष्याबाबत कोणतीही कल्पना नसलेल्या वयात 13 ते 17 वर्षे वयोगटातील मुले आणि मुलींमध्ये बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त आहे. यात जवळपास 98 टक्के प्रकरणात प्रेमप्रकरण आणि घरच्यांचा प्रेमास होणारा विरोध, असा निष्कर्ष निघाला आहे.
असे का घडले? - विदेशी तरुणाशी फेसबुकवर फुलले प्रेम आणि बदल्यात मिळाले हे...
लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत गांभीर्याने दखल घेत 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने पालकवर्ग चिंतित आहे. अल्पवयीन मुले-मुली पळून गेल्यानंतर थेट अपहरणाचा गुन्हा नोंदवावा लागत असल्याने पोलिसांच्याही डोक्याला ताण होत आहे.
प्रेमप्रकरणातून मुले-मुली घरातून पलायन केल्यानंतर काही दिवस मौजमजा करतात. मात्र, खिशातील पैसे संपल्यानंतर प्रेमाची "नशा' उतरते. त्यानंतर कुठेतरी हातपाय मारण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, शेवटी प्रियकर मुलीला वेश्याव्यवसाय किंवा वाममार्गाला लावतात. त्यातून दोन पैसे कमविणे किंवा दलालांमार्फत थेट प्रेयसीची विक्री करतात, असेही प्रकार उघडकीस आले आहेत.
अल्पवयीन मुले बेपत्ता होण्यामागे प्रेमप्रकरण किंवा कौटुंबिक वाद हेच प्रमुख कारण असल्याचे आतापर्यंतच्या उलगडा झालेल्या प्रकरणांमधून निष्पन्न झाले. विभक्त कुटुंब आणि "सिंगल पॅरेंट' असलेल्या कुटुंबातील मुलांमध्ये पळून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. शारीरिक आकर्षण आणि चमकणाऱ्या दुनियेची भुरळ पडल्याने घर सोडल्याची जास्त घटना आहे.
आकडे बोलतात... | |
वर्ष | बेपत्ता मुले-मुली |
2016 | 509 |
2017 | 494 |
2018 | 479 |
2019 | 338 |
नागपूर पोलिस कटिबद्ध
मिसिंग मुले-मुलींना शोधण्यासाठी पोलिस "ऑपरेशन मुस्कान' दरवर्षी राबवीत आहे. यासोबतच प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये पीएसआय दर्जाचा विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मुलांच्या मिसिंगच्या प्रकरणांची गांभीर्याने नोंद घेऊन पोलिस लगेच शोधकार्य प्रारंभ करतात. त्यामुळे मिसिंगच्या तक्रारींचे समाधान करण्यासाठी नागपूर पोलिस कटिबद्ध आहेत.
- नीलेश भरणे,
डीआयजी, नागपूर शहर पोलिस
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.