नागपूर : ‘नगर में ढिंढोरा पिटवा दो दादा. बच्चे, बडे, बुढे सबको कहना के मैंने बुलाया है. तलवार, हातोडा, कुल्हाडी, आरी, दराती, भाला, कुदल जो मिले वो ले आवो. अपने हाथों को हथियार बनालो. अपनी सांसों को आँधियो में बदल दो. हमारा रक्तही महासेना है'
‘बाहुबली २’ या सिनेमात महेंद्र बाहुबली रयतेला स्फुरण चढावे, यासाठी आवाहन करतो. शस्त्रसज्ज आणि युद्धनिपुण सैनिकासोबत मग सामान्य माणूस लढतो. हे फक्त सिनेमात असे घडू शकते, असे सिनेमा पाहाताना आपल्याला वाटून जाते. परंतु, बाहुबलीसारख्या त्वेषाने लढणारा एक महानायक प्रत्यक्षात होऊन गेला. त्याचे नाव क्रांतिवीर समशेर सिंग भोसले. त्यांनी सामान्य लोकांना केलेले हे आवाहन वाचा...
माझ्या वाघांनो, गोऱ्यांनी आपलं सारंच हस्तगत केलंय. याचकरता आपण सर्व जण जाणती मंडळी एकत्र जमलो आहो. माझ्या मर्दांनो, आपण रक्त पिणाऱ्या जातीचे. देवीलाडीला रक्त पाजायचे आहे. गोऱ्यांना सापडेल तिथे कापा. जिवात जीव असेपर्यंत लढ्यात जितकी माणसे जमवता येतील तितकी माणसे जमवा. एकदा की इथल्या गोऱ्यांना हरवले की, आपलेच राज्य येणार आहे. तलवार, बरछा, भाले, गोफण, सुऱ्या, गिलवरी, तातला फासे, मराशी फासे दुश्मनांच्या आडव्या रस्त्यांवर पेरून ठेवू. त्यांचे सैन्य पडले की अर्धी लढाई सोपी जाईल. आपणच हीसुद्धा लढाई जिंकू. देवीमातेच्या कृपेने विजय आपलाच होईल. आपण स्वतःच्या राज्यात धनदौलतीने सुखी होऊ या... जय सोमनाथ!
ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढण्याचे आवाहन करणारे समशेर सिंग भोसले यांचे पारधी, फासेपारधी, वाघरी लोकांपुढे केलेले भाषण. त्यावेळी समशेर सिंग सौराष्ट्रामध्ये पाच हजारांच्या वर कुटुंबांचे संरक्षक होते. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर दीड हजार लोक युद्धासाठी तयार झाले. पारधी सैन्याबरोबर दहा-बारा वर्षांची मुले-मुली, तरुण, महिला, म्हातारे मिळून सहभागी झाले. काठेवाड येथे १ जानेवारी १८५७ मध्ये ही लढाई झाली.
सौराष्ट्रातील पारधी, वाघरी, काठेवाडी पारधी, फासेपारधी बांधवांनी समशेर सिंग यांना आपला मुखिया मानले. दुभंगलेल्या पारधी समाजाच्या शाखा समशेर सिंगच्या नेतृत्वात ते स्वातंत्र्यलढ्यासाठी एकत्र आल्या. ब्रिटिशांविरुद्ध समशेर सिंग यांनी दोन युद्धे केली. दुसऱ्या युद्धात महाराजा गायकवाड यांनी समशेर सिंग यांच्याबद्दल एका गैरसमजुतीतून ब्रिटिश सैन्याला सोबत घेऊन समशेर सिंग यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. ओखाबेटामध्ये तुंबळ युद्ध झाले.
या लढाईत समशेर सिंगने निकराची झुंज दिली. परंतु, या फौजापुढे त्यांच्या सैन्याचा निभाव लागला नाही. समशेर सिंगच्या कुटुंबातील अनेक जण यात धारातीर्थी पडले. परंतु, समशेर सिंगने स्वतःची सुटका करून घेतली. पुढे त्यांनी ब्रिटिशांच्या पाठलागाला सतत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यावर बक्षीस जाहीर केले. खबरीच्या मदतीने समशेर सिंगला ताब्यात घेतले. एक एप्रिल १८५८ मध्ये त्यांना फाशी दिली. ही सर्व माहिती लेखक आणि संशोधक भास्कर भोसले यांनी त्यांच्या आदिवासी संस्कृती, इतिहास आणि वेदना या ग्रंथात लिहून ठेवली आहे.
ब्रिटिशांच्या गुलामीविरुद्ध लढणाऱ्या अनेक क्रांतिवीरांना गुन्हेगार ठरविले गेले. अनेकांना ठार मारण्यात आले. सुळावर चढविण्यात आले. आजही स्वतंत्र भारतातील ११ कोटी आदिवासी बांधव कुठल्या ना कुठल्या गुलामीविरुद्ध लढताहेत. विशेषतः देशभरातील कोट्यवधी पारधी बांधव त्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या मूलभूत गरजांसाठीच लढत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच त्यांचा लढा सुरू आहे.
जगण्याच्या किमान गरजा पूर्ण न होणे म्हणजे एकप्रकारे गुलामीच म्हणावी लागेल. समशेर सिंग भोसले यांचा अनाहूतपणे का होईना वारसा चालवीत आहेत. या सर्व इतिहासाची उजळणी यासाठी की आज आदिवासी दिन आणि त्यातही समशेर सिंग यांची आठवण करण्याचे आणखी एक निमित्त आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा या गावात समशेरसिंग भोसले यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
समशेर सिंग यांची समाधी शोधून काढणारे संशोधक भास्कर भोसले यांनी केलेल्या दाव्यानुसार, हा देशातील पहिलाच पुतळा असेल. समशेर सिंग यांच्या नावाने चांपा येथील पारधी वस्तीचे समशेरनगर असे नामकरणही आज करण्यात येणार आहे. म्हटली तर ही छोटी गोष्ट; परंतु मानली तर मोठी... आदिवासी पारधी समाजाच्या अस्मितेच्या प्रतीकाची पुनर्स्थापना होत आहे. केवळ पारधी आणि आदिवासी बांधवासाठीच नव्हे तर समस्त भारतीयांसाठी खराखुरा बाहुबली असलेल्या या स्वातंत्र्ययोद्ध्याचे स्मरण यानिमित्ताने करूया...
संपादन - नीलेश डाखोरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.