गिरीबालाजीनगर, कुकडे ले-आऊटवासीय भोगताहेत नरकयातना 

Lack of civic amenities, contaminated water to wells
Lack of civic amenities, contaminated water to wells

नागपूर : एक टुमदार घर असावे... पोहोचण्यासाठी वळणदार वाट असावी... घरासमोर हिरवळ असावी... नागरी सुविधांसह सुखकर जीवन व्यतित करता यावे, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु, गिरीबालाजीनगर आणि  कुकडे ले-आऊट परिसरातील रहिवाशांसाठी ही अपेक्षा दिवास्वप्नच ठरली आहे. नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन कारवा लागत आहे.

शहराच्या सीमेवर असणाऱ्या या वसाहतीत प्रामुख्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची घरे आहेत. निवृत्तीनंतरच्या लाभातून स्वप्नांचे घर साकारले. संपूर्ण पुंजी खर्ची घातली. उर्वरित आयुष्य शांतपणे घालविता येईल, अशी अपेक्षा होती. सध्याच मोकळी वसाहत असली तरी हळूहळू विकास होईल, अशी त्यांची भाबडी समजूत होती. त्याच आशेवर दिवस काढणे सुरू आहे. पण, मोठा काळ लोटूनही नागरी सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. शांततेच्या शोधात शहराचा मध्यवर्ती भाग सोडून येथे आलो. त्यावेळी सोसायटीकडून अनेक सुविधांची माहिती दिली होती. लवकरच विकास होणार असल्याचे स्वप्नही दाखविले. आतामात्र प्रचंड गैरसोईंचा सामना करावा लागत असून फसगत झाल्याचे वाटू लागल्याचे नागरिक सांगतात. 

मोठमोठ्या खड्डेपूर्ण रस्त्यांमुळे घरापर्यंत पोहोचण्याची वाट बिकट आहे. पावसाच्या वेळी घरापर्यंत पोहचण्यासाठी कसरत करावी लागते. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचते. यामुळे डास व किटकांचा त्रास असह्य झाला आहे. यामुळे रोग बळावण्याचा धोकाही वाढला आहे. मोकळ्या भूखंडांवर पाणी साचते. तेच विहिरी आणी बोअरवेलमध्ये झिरपते. परिणामी परिसरातील भूमिगत पाणी प्रदूषित झाले आहे. त्याच पाण्याचा दिनचर्येसाठी उपयोग करावा लागतो. विशेष म्हणजे गडरलाईन नसल्याने घरोघरी सेफ्टी टॅंक आहेत. त्यामुळे जलस्रोत दूषित झाले आहेत.   

ठिकठिकाणी झुडपे वाढली आहेत. अनेक निरुपयोगी वेली तर घराच्या छतापर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळेही मोठी गैरसोय होते. होणाऱ्या त्रासाबाबात नगरसेवक व लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. किमान रस्ते, गडरलाईनची व्यवस्था करण्यात यावी, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.

स्मार्ट सिटी केवळ नावापुरती आहे. दररोज खड्डेमय रस्त्यातून चिखल तुडवीत घर गाठावे लागते. दिनचर्येसाठी दूषित पाण्यावरच अवलंबून आहोत. परिसारातील नागरिकांना आजारांची लागण होत आहे. अनेक समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत. जवळच नाला असल्याने थोड्या पावसातही घराच्या पायरीपर्यंत पाणी येते. माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारात नाला खोलीकरण आणि भिंत बांधण्याचा विषय मांडला होता. त्यावेळी त्यांनी भरसभेत सहा महिन्यांत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही. नागरी सुविधाच होत नसतील तर सरकारी यंत्रणा कर कशाचा घेतात.
बंडूजी पांडे, स्थानिक रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com