कोरोना, तू लवकर जा रे बाबा... तुझ्यामुळे आम्हाला आंबे खायला मिळत नाहीये...

file photo
file photo

नागपूर : कोरोना विषाणुचा प्रसार वाढत चालल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्वच बाजारपेठेवर झाला आहे. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने विविध प्रकारच्या आंब्याचे आगमन बाजारपेठेत झाले. सर्वांनाच घरबसल्या आंब्याची चव चाखण्याची इच्छा होत आहे. पण लॉकडाऊनच्या बडग्यामुळे नागरिकांना आंबा खरेदी करता येत नसल्याने आंब्याचा गोडवा हरवला आहे.

गुढीपाडवा झाला की सर्वांनाच द्राक्षे, टरबुज आणि आंबे अशा फळांची आठवण येते. गुढी पाडव्यानंतर बाजारपेठेत आंब्याची आवक सुरू होते. रत्नागिरी हापुस, सिंधुदुर्ग, देवगड असा कोकणातला राजा म्हणून ओळखल्या जाणा-या हापुस आंब्याचे जोरदार आगमन झाले होते. काही दिवसातच कोरोना विषाणुचा फैलाव देशामध्ये सुरू झाला. त्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम झाला आहे.

भाजीपाल्यासह फळ मार्केटला देखील कोरोनाचा फटका बसला आहे. उपराजधानीत फळ मार्केटमध्ये विविध ठिकाणाहून फळांची आवक होते. विविध भागात आणि परिसरातील गावांमध्ये फळांची विक्री होते. पण कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने फळांची खरेदी कोण करणार असा मुद्दा निर्माण झाला आहे. सध्या बाजारपेठेत काही किरकोळ व्यापारी फळांची खरेदी करून हातगाडीच्या माध्यमातून विक्री करीत आहेत. सध्या वाहतूक बंद असल्याने परराज्यातून येणाऱ्या फळांची आवक कमी झाली आहे.

मागणीनुसार फळांचा दर

सध्या फळ बाजारपेठेत हापुस आंब्याचा दर 800 रुपये डझनपासून 400 रुपयेपर्यंत आहे. तसेच लहान आणि मोठ्या आकाराच्या आंब्याचा दर मागणीनुसार आहे. तसेच संत्री, सफरचंद, द्राक्षे आदी फळांची आवक घटली आहे. शीतगृहात असलेला साठा विक्रीसाठी काढण्यात येत आहे. त्यामुळे सफरचंदचा दर 150 रुपये प्रतिकिलो आहे. द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने आवक घटली आहे. तरी देखील फळ बाजारपेठेत 50 ते 80 रुपये किलो दराने द्राक्षाची विक्री होत आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, मागणीदेखील वाढत आहे.

फळ उत्पादकांना कोरोनाचा फटका

आंब्याचा गोडवा चाखण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे. पण बाजारपेठ बंद असल्याने आणि संचारबंदी असल्याने नागरिकांना आंबे मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे आंब्याचा गोडवा हरवला आहे. सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक असली तरी उचल म्हणावी तशी होत नाही. त्यामुळे फळ विक्रेत्यांसह बागायतदार, फळ उत्पादकांना कोरोनाचा फटका बसला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी सोसावी लागत आहे. फळे घेण्यासाठी नागरिकांना जादाचे पैसे देखील मोजावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असलेल्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com