नागपूर : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनचा फटका लग्नासह सर्व धार्मिक समारंभांना बसला आहे. आता जवळपास सर्वच लग्न समारंभ रद्द झाले तर काहींनी पुढे ढकलले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये मंगल कार्यालयांना तब्बल 120 कोटींचा फटका बसला आहे. आता सर्वांना दिवाळीनंतरच लग्नाचा बार उडवावा लागणार आहे.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सावरण्यास किमान तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहे. किमान संपूर्ण एप्रिलमध्ये जिल्हाबंदी कायम राहील, असे संकेत आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांची कमतरता भासणार आहे.
प्रतापनगर येथील नक्षत्र मंगल कार्यालयाचे संचालक प्रशांत चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता कोरोनामुळे मंगल कार्यालयांना चांगलाच फटका बसल्याचे सांगितले. एका मंगल कार्यालयात एका सिझनमध्ये साधारणत: 60 ते 65 लग्न होतात. नागपुरात 8 ते 10 लाखांपर्यंत लग्नाचे पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये रोषणाई, कॅटरिंग, मंडप, भटजी, अक्षदा, वरात, बॅंडवाले, फोटो शूट व व्हिडिओ शूटिंग, वरपक्षाची सरबराई, अल्बम, लग्नानंतर वराकडच्यांना लाडू-चिवड्याची पाकिट देणे अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. वरपक्षाला फक्त घरून बॅगा भरून यावे लागते.
एका मंगल कार्यालयात सरासरी 60 लग्न लागतात, असे समजले तरी 20 मंगल कार्यालयांत 1,200 लग्न लागतात. 10 लाखांचे पॅकेज पकडले तरी साधारणत: 1,200 कोटींचे नुकसान केवळ लग्न रद्द झाल्यामुळे वा पुढे ढकलण्यात आल्यामुळे झाले. पावसाळ्यात मंगलकार्ये होत नाहीत. त्यामुळे दिवाळीशिवाय पर्याय नाही. लग्नाव्यतिरिक्त वर्षभर मुंज, साक्षगंध, वाढदिवस, कॉर्पोरेट सेक्टरचे कार्यक्रम चालतात. लॉकडाउनमुळे 14 एप्रिलपर्यंत कोणताही कार्यक्रम घेता येत नाही. त्यानंतरही परिस्थिती सावरेल असे चित्र सध्या तरी नाही, असे चौधरी म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.