नागपूर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा विदर्भाला कसलाही धोका नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन दिवस पाऊस व ढगाळी वातावरण राहणार आहे. बुधवारी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगाने मार्गक्रमण करीत असलेले चक्रीवादळ कोकण व मुंबईमार्गे पुढे सरकून नंतर कमजोर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या वादळाचा विदर्भावर फारसा परिणाम होणार नाही. तथापि कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव निश्चितच जाणवेल. बुधवारपासून दोन -तीन दिवस विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे. बुधवारी काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज सकाळच्या सुमारास शहरात दमदार सरी कोसळल्या. साडेसातनंतर पूर्व व दक्षिण नागपुरातील अनेक भागांमध्ये अर्धा ते पाऊण तास वरुणराजा चांगलाच बरसला. पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली. नागपूरच्या आकाशावर अगदी मॉन्सूनप्रमाणे काळेकुट्ट ढग जमले होते. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत 9.1 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात घट होऊन पाच दिवसांपूर्वी 47 अंशांवर गेलेला पारा 32 अंशांवर आला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.