संकट काही संपेना!  धानकापणीसाठी मजुरांचा तुटवडा; एकाच वेळी अनेकांकडे काम 

no workers for rice crop cutting in gadchiroli
no workers for rice crop cutting in gadchiroli

गडचिरोली : धान उत्पादकांचा जिल्हा असा लौकिक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील धानशेतीला संकटांची मालिका सतत सतावत असते. मोठ्या मेहनतीने जगवलेले पीक आता कापणीला आले असताना मजुरच मिळत नसल्याने कित्येक ठिकाणी शेतकऱ्यांची धानकापणी रखडली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

दरवर्षी धानाच्या खरीप हंगामासोबत संकटांची मालिकाही सुरू होते. कधी पेरणी केल्यावर पाऊसच येत नाही, तर कधी मुसळधार पाऊस येतो. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येते. मग, पऱ्हे तयार झाले आणि पावसाने ओढ दिली की, शेताच्या बांधीत रोवणीयोग्य चिखल होत नाही. मग, रोवणी रखडते. इकडे धानाचे पऱ्हे गुडघाभर वाढून रोवणीची योग्यता गमावून बसतात. हे संकट पार पडले की, अचानक मुसळधार पाऊस येऊन रोवलेली रोपेच वाहून नेतो. हे सगळे झाल्यावर पीक जेव्हा जोमाने वाढू लागते तेव्हाही अवकाळी पाऊस येतो किंवा गादमाशी, खोडकिडा, लष्करी अळी, तुडतुडा आदी रोगकिडींचा हल्ला होतो. हा हल्ला परतवून लावताना शेतकऱ्यांची पुरती दमछाक होते. शिवाय त्यासाठी महागडी कीटकनाशके वापरत असल्याने आर्थिक बोझा वाढत जातो. 

हे सगळे दिव्य पार करून शेतात डौलाने उभे सोनपिवळे धानपीक कापणीला येते तेव्हा मजुरांचा तुटवडा जाणवतो. धानलागवड करताना जड, मध्यम आणि हलका अशा तीन प्रकारच्या धानाची लागवड केली जाते. जड धान उशिरा पक्‍व होतो, मध्यम त्याहून कमी वेळ घेतो, तर हलका धान लवकर पिकतो. पण, अनेक गावांमध्ये बहुतांश शेतकरी एकाच वेळेस यापैकी कुठलाही एक धान लावतात. म्हणजे एखाद्या गावात बहुतांश शेतकऱ्यांनी जड धान लावला, तर पक्‍व होण्याचा कालावधी जवळपास सारखाच असल्याने प्रत्येकाचीच कापणीची वेळे सारखी येते व मजुरांचा तुटवडा पडतो. 

शिवाय अनेक शेतमजूर या काळात इतर कामांसाठी मोठी शहरे किंवा नजीकच्या तेलंगणासारख्या राज्यात रोजगारासाठी स्थलांतर करतात. हा काळ सणांचा असल्याने काही शेतमजुर किरकोळ वस्तूंच्या विक्रीची किंवा पूजासाहित्य आदी विक्रीचे व्यवसाय सुरू करतात. त्यामुळेही एकूण मजुरांची संख्या कमी होती. म्हणून शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागते. येथील शेतकरी सधन नसल्याने कापणीसाठी अत्याधुनिक महागडी यंत्रे वापरू शकत नाहीत. 

अनेकदा शेतात कापणीसाठी सज्ज असलेले पीक अचानक वादळी, अवकाळी पाऊस आल्याने जमीनदोस्त होते किंवा पाण्यात भिजल्याने अंकुरते. कधी शेतात पीक कापून त्याच्या कडपा ठेवल्या असताना अचानक आलेल्या पावसात कडपा भिजून धान अंकुरतो म्हणून शेतकऱ्यांना योग्य वेळ व हवामानाचा अंदाज घेऊन कापणीचा निर्णय घ्यावा लागतो. या अखेरच्या टप्प्यावर मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे..

डब्यासोबत डब्याशिवाय...

बहुतांश ग्रामीण भागांत अद्याप मजुरीचा दर फारसा वाढला नाही. सरासरी मजुरी 120 रुपये रोज प्रमाणे दिली जाते. मजुरांच्या जेवणाची सोय स्वत: शेतमालक करत असेल, तर मजुरी 120 रुपये असते. मात्र, मजुर स्वत:ची शिदोरी किंवा डबा घेऊन येत असतील, तर मजुरीचा दर 130 रुपये असतो. तरीही अनेक गरीब शेतकऱ्यांना हा मजुरीचा दरही परवडत नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com