नागपूर जिल्ह्यात फक्त ३७ टक्के अभ्यासक्रम पूर्ण; हा तालुका आहे शेवटच्या स्थानावर

Only thirty seven percent of the courses are completed in Nagpur district
Only thirty seven percent of the courses are completed in Nagpur district

नागपूर : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. असे असले तरी नववी ते बारावीचा अभ्यासक्रम फक्त ३७ टक्केच पूर्ण झाल्याने विद्यार्थी आणि पालक चिंतेत सापडले आहेत. दहावी आणि बारावी महत्त्वाचे वर्ष असल्याने विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद आहेत. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईनचा प्रयोग केला जात आहे. आता परीक्षांना अवघे दोन ते तीन महिने शिल्लक आहेत. उत्तीर्ण व्हायला ३७ टक्के गुण लागत असताना तेवढाच अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने नापासांची संख्याही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पारशिवनी तालुक्यात तर फक्त २० टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षकांनी काय केले, असा सवाल उपस्थित होत आहे. मुख्याध्यापक आणि त्यावरील यंत्रणांनीही योग्यरीत्या काम केले नसल्याची टीका होत आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर अनेक उद्योगांना काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. शाळा मात्र सुरू करण्यात आल्या नाही.

महाविद्यालयांच्या परीक्षा लांबल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. परंतु, अनेकांकडे ऑनलाईनची सुविधाच नसल्याची ओरड होती. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. साधारणतः दिवाळीपूर्वी निम्मा अभ्यासक्रम पूर्ण होतो. परंतु, यंदा ऑनलाईनद्वारे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निम्माही अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही.

सर्वांत कमी पारशिवनी तालुक्यात

माध्यमिक विभागाकडून पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ३७.०८ टक्केच अभ्यासक्रम ऑनलाईनद्वारे पूर्ण झाला. यात सर्वाधिक ७५ टक्के अभ्यासक्रम नागपूर ग्रामीण तालुक्यात झाला. त्यापाठोपाठ ६८.१० टक्के अभ्यासक्रम कळमेश्‍वर तालुक्यात पूर्ण झाला. हिंगणा तालुक्यात ६८ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला. सर्वांत कमी २०.४ टक्के अभ्यासक्रम पारशिवनी तालुक्यात आहे. मौदा तालुक्यात २२.१ टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला. भिवापूर, कुही ३५ टक्केच्या आत आहे.

४८ हजार विद्यार्थ्यांकडे नाही ऑनलाईनची सुविधा

जिल्ह्यात नऊवी ते बारावीचे एक लाख ३४ हजार ५२७ विद्यार्थी आहेत. यातील ४८ हजार १०९ विद्यार्थ्यांकडे ऑनलाईची सुविधा नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com