
जलालखेडा-मौदा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील अनेक भागांत हरभऱ्याच्या पिकावर मूळकूज अर्थात ‘मर’ रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या बुरशीजन्य रोगामुळे झाडांची मुळे कुजत असल्याने झाड पिवळे पडून वाळत आहे. दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरणामुळे चण्याच्या पिकावर अळीचाही प्रादुर्भाव वाढल्याने हे पीकही हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
नरखेड तालुक्यात हरभऱ्याच्या पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादनात घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाचा झालेला विलंब, नंतर कोसळलेला संततधार पाऊस, सततचे ढगाळ वातावरण यामुळे बहुतांश खरीप हंगामातील पिके हातची गेली. त्यामुळे मुख्यतः सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे.
कपाशीची वाढ खुंटली व नंतर बोंडअळीने आक्रमण केले. त्यातच मजुरांची टंचाई, दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी झाली. परिणामी, कापसाचे उत्पादनही पाहिजे त्याप्रमाणे झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर विशेष लक्ष केंद्रित केले. पण आता या पिकानेही शेतकऱ्यांना धोका दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मौदा तालुक्यातील नवेगाव (कोराड) येथील शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे पीक पिवळे पडले आहे. नुकसानभरपाईसाठी तहसीलदार प्रशांत सांगडे व कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांना निवेदन देण्यात आले. कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पिकावर फवारणी केली. महागाचे बियाणे घेऊन महागड्या औषधांची फवारणी केली. परंतु, त्याचा काहीही फायदा न होता शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त होत आहे, अशी शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया नोदविली.
सोमवारला चौकशीकरिता पाठवतो
कृषी विभागात शुक्रवारी शेतकऱ्यांनी दिलेले रोगाबद्दलचे निवेदन मिळाले आहे. कृषी सहायक यांना सोमवारला चौकशीकरिता पाठवतो.
- संदीप नाकाडे,
कृषी अधिकारी, मौदा
पत्र आल्याशिवाय मी अहवाल देऊ शकत नाही
हरभऱ्याची बीजप्रक्रिया बरोबर न केल्यामुळे हा रोग येत असतो. नवेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहून आलो आहे. हा ‘मर’ रोग आहे, शेतकऱ्यांचे पत्र आल्याशिवाय मी अहवाल देऊ शकत नाही. सोमवारी किंवा मंगळवार कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हरभरा पीक पाहणी करीन व तसा अहवाल शासनाला सादर करणार.
- धनंजय कोकाटे,
कृषी सहायक, मारोडी सर्कल
अहवाल मागवून तत्काळ मदत द्यावी
हरभरा ‘मर’ रोगाने पूर्ण पिवळा पडला आहे. हरभरा भरलेला नाही. त्यामुळे यावर्षी हरभऱ्याचे पीक होणार नाही. त्यामुळे शासनाने कृषी अधिकारी व तलाठी यांना अहवाल मागवून तत्काळ मदत द्यावी.
- प्रभाकर झोड,
शेतकरी, नवेगाव
तर शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होईल
शेतकऱ्यांनी बियाणे पेरताना बीज प्रक्रिया करूनच पेरले तर शेतात असली बुरशीवर नियंत्रण मिळविता येते. पण आता यावर उपाय करता येत नाही. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश कृषी सहाय्यकांना देण्यात येणार आहे. इतर पिकांसारखे हेही पीक गेले तर शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होईल.
- डॉ. योगीराज जुमडे,
तालुका कृषी अधिकारी, नरखेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.