नागपूर : महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने देखभाल दुरुस्तीला फाटा दिल्याने खड्ड्यांमुळे उड्डाणपुलावरून वाहने चालविताना अपघाताची शक्यता बळावली आहे. उड्डाणपुलावरून उतरताना खड्ड्यांमुळे अचानक ब्रेक मारल्यामुळे मागील वाहने धडकत असून वाहने पुलावरून खाली पडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. शहरातील काही उड्डाणपुलावरून वाहने चालविताना नागरिकांची हाडे खिळखिळी होत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांसह उड्डाणपुलांचीही संख्या वाढली असून त्यात आणखी वाढ होणार आहे. उड्डाणपुलामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटलाच, शिवाय शहर सौंदर्यातही भर पडली. उड्डाणपुलामुळे शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. परंतु, शहराचा हा लौकिक कायम राखण्यास महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. जुन्या उड्डाणपुलावरील रस्त्यांमुळे शहरांतील महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दारिद्र दिसून येत आहे. सक्करदरा, पाचपावली तसेच गणेश टेकडी उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले असून नागरिकांना ते वाचविताना अक्षरशः सर्कस करावी लागत आहे. चारचाकी असो की दुचाकी, प्रत्येक वाहनधारकांना तसेच त्यातील प्रवाशांना उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे धक्के खावे लागत आहे. या उड्डाणपुलावरून जाताना नागरिकांची हाडे खिळखिळी होत आहे. दिवसभर वर्दळ असलेल्या या खड्डेमय उड्डाणपूलावरून पाठीच्या दुखण्याचा त्रास, स्पॉंडेलायटिसचे रुग्णही ये-जा करतात. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातच तरुणाई वेगाने दुचाकी, चारचाकी चालवीत असल्याने त्या उसळताना दिसून येत आहे. मात्र अॅडव्हेंचरच्या नादात वेगाने वाहने चालविणाऱ्यामुळे इतरांना अपघात होण्याची शक्यता आहे. शंभर वर्षे आयुष्य असलेल्या या उड्डाणपुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. एकीकडे उड्डाणपुलाचे जाळे वाढत असताना जुने उड्डाणपुलावरून प्रवास डोकेदुखी वाढविणारा ठरत आहे.
वेळ वाचविण्याच्या उद्देशाला हरताळ -
रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे गंतव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याने उड्डाणपूल उपयुक्त पर्याय ठरले होते. वाहतूक कोंडीत घट आणि नागरिकांचा वेळ वाचविण्याच्या उद्देशाने उड्डाणपूल तयार करण्यात आले. परंतु, सक्करदरा, पाचपावली तसेच गणेश टेकडी उड्डाणपुलावरील खड्ड्यातून वाहने काढताना नागरिकांचा वेळ खर्ची होत आहे. त्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. या उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अनेक नागरिक मूळ रस्त्यांवर आले. परिणामी रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढून वाहतूक कोंडी, अपघाताच्या समस्या वाढण्याची शक्यता बळावली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.