तीन थोरल्या बहिणी, दोघींच्या लग्नानंतर तिसरीची चिंता अन्‌ वडिलांचे उतारवय, अशात मुलाने घेतला हा निर्णय...

Suicide of a youth in Nagpur district
Suicide of a youth in Nagpur district

कळमेश्‍वर-मोहपा (जि. नागपूर) : घरी आई-वडील... तीन थोरल्या बहिणी.. असे सहा जणांचे कुटुंब... तीन ते चार एकर शेती... सततची नापिकी... वडिलांवर वाढत चाललेला कर्जाचा डोंगर... मोठ्या बहिणीच्या लग्न... कोरोनाचे संकट... अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणेही कठीणच... वडील सतत चिंतेत असताना 19 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल... 

प्राप्त माहितीनुसार, कळमेश्‍वर तालुक्‍यातील सुसुंद्री येथे चंद्रशेखर काळे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. घरी सहा सदस्य. त्यात तीन थोरल्या बहिणी. वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी व शेतीसाठी बॅंक व सावकाराकडून कर्ज काढले. शेतीत नुकसान होत असतानासुद्धा दोन थोरल्या बहिणींचे लग्न झाले. त्यामुळे घरची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. वाढत्या वयासोबत वाढत चाललेल्या कर्जाच्या डोंगरामुळे वडील नेहमीच चिंतेत असायचे.

अशात तिसरी बहीण लग्नाची झाली. यामुळे वडिलांची चिंता वाढत गेली. लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करायची कशी, या विवंचनेत ते राहत होते. दुसरीकडे शेतीची समस्या. नापिकीमुळे पदरी दोन पैसे पडत नव्हते. अशात कोरोना विषाणूचा वेगळा कहर. यामुळे चिंता आणखीनच वाढली. कराव तरी काय, असाच प्रश्‍न कायम असायचा. दुसरीकडे मुलगा 19 वर्षांचा. त्याला वडिलांची चिंता बघितली गेली नाही. आपणही वडिलांची मदत करू शकत नसल्याचे गौरवने विष घेऊन मृत्यूला कवटाळले. 

वडिलांना मदतीसाठी सोडले शिक्षण

गौरव काळे हा तसा अभ्यासात हुशार होता. त्याला एनडीएमध्ये जायचे होते. त्या दृष्टिकोनातून त्याने प्रयत्नही सुरू केले होते. दुसरीकडे वडिलांचे वय वाढत असल्याने शेतीचे काम करणे कठीण जात होते. आपले शिक्षण पूर्ण करावे की वडिलांना मदत करावी, या चिंतेत गौरव असायचा. अशात त्याने शिक्षण सोडून वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गौरवने महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडून वडिलांना शेतीत मदत करायला सुरुवात केली. नापिकी व कोरोनामुळे कामाचे फलीत मिळत नव्हते. यामुळे त्याची मेहणत वाया गेली. दुसरीकडे शिक्षण सोडले. याच चिंतेतून त्याने मृत्यूला कवटाळल्याचे बोलले जाते.

29 जूनला मधल्या बहिणीचे लग्न

29 जूनला गौरवच्या मधल्या बहिणीचे लग्न झाले होते. यानिमित्त गुरूकळोचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात गौरवच्या डोक्‍यात तिसऱ्या बहिणीच्या लग्नाचे विचार घोंगावत होते. तिच्या लग्नासाठी पैसा आणयचा कुठून, त्याच वडिलांवर शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचे डोंगर वाढत असताना नापिकी होत असल्याने त्यांच्या मनात अनेक विचारांनी घर केले. त्यातून त्याने बुधवारी शेतात विष घेतले. त्याच्यावर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला. वडिलांच्या उतारवयात कुटुंबाचा एकमेव आधार असलेला कर्त्यामुलाच्या अशा निधनाने कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com