नुकसानीच्या सर्वेक्षणात कपाशीला डच्चू, अधिकारी म्हणतात,...

file
file

जलालखेडा (जि.नागपूर): ऑगष्ट महिन्यात सततच्या पावसामुळे बुरशी, थ्रिप्स, चक्रिभुंगा,  विषाणूजन्य पिवळी मोजॅकच्या संक्रमणामुळे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे ब्राऊन रॉटच्या प्रकोपामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबी फळांची गळ झाल्यामुळे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच याच काळात कपाशीच्या पिकावर ‘मर' रोगाने आक्रमण केल्यामुळे मोठे नुकसान झाले . तसेच आता सुद्धा मागील आठ दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळेही कपाशीचे नुकसान होत आहे. तरी पण नुकसानीचे सर्वेक्षणाचे आदेश आल्यानंतर कृषी विभाग व महसूल विभाग पंचनामे करायला लागले असून यात सोयाबीन, संत्रा व मोसंबी याच पिकांचा आदेशात समावेश असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
 
अधिक वाचाः सांगा जहॉंपनाह ! जीव धोक्यात घालून सर्वेक्षण करायचे कसे ?

शेतकऱ्यांची घोर निराशा
सोयाबीन व फळ पिकांच्या नुकसानीची माहिती मिळताच सत्ताधारी व विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. याची शासनस्तरावर दखलही घेण्यात आली व विविध रोगांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित गावातील कृषी सहायक, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सचिव, पोलिस पाटील व सरपंचाच्या उपस्थितीत संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश नरखेड तहसीलदार हरीश गाडे यांनी दिले. तसेच हे संयुक्त पंचनामे करताना एकही पीडित शेतकरी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही दिले. सोबतच सर्व संयुक्त पंचनामे तालुका कार्यालयाला पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याची दखल नरखेड तालुक्यातील कृषी विभागाने घेतली व नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात देखील करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मोसंबी यासह संत्रा पिकांचे पंचनामे करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. पण नुकसानीच्या सर्वेक्षणात कपाशी पिकाचा उल्लेख नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. सततच्या पावसामुळे पात्या, फुले गळाली व आलेली थोडीफार बोंडे  सडली. तसेच ‘मर’ रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे नुकसान होऊन या पिकाचा उल्लेख नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पीकनिहाय स्थिती
नरखेड तालुक्यात यावर्षी ४७०८३ हेक्टर शेतीत खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. यात १५८१८ हेक्टरमध्ये सोयाबीन तर २०५९३ हेक्टरमध्ये कपासीची पेरणी करण्यात आली आहे. तर १०६७२ हेक्टर क्षेत्रात अन्य पिके आहेत. याचबरोबर १५२०० हेक्टरमध्ये संत्रा व ६००० हेक्टरमध्ये मोसंबीचे पिक घेतले जाते.

आदेशच नाही
एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेत आहोत. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांची पिके व संत्रा, मोसंबी फळांचे झालेल्या मोठ्या प्रमाणात नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. पण यात कपाशी पिकाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश नसल्यामुळे त्याचे सर्वेक्षण करण्यात येत नाही.
डॉ. योगीराज जुमडे
तालुका कृषी अधिकारी, नरखेड

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com