खासगी जिनींगमध्ये भाऊ, क्विंटलमागे हजाराचे नुकसान रे !

file
file

जलालखेडा (जि.नागपूर) :  नरखेड आणि काटोल तालुक्‍यात सर्वांत जास्त कापूस पेरणी करण्यात आली होती. केंद्र शासन व राज्य शासन यांनी संयुक्तपणे शासकीय कापूस खरेदी केंद्र नरखेड व काटोल तालुक्‍यात सुरू करून कापूस खरेदी करण्यात आली. कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जवळपास दीड महिन्यापासून खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. खासगी जिनिंगमध्ये कापूस 4600 रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्यात येत आहे. जवळपास एक हजार रुपये प्रतिक्विंटल नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन तोट्यात आले आहे.
 

हमीभावाने कापूस खरेदी करणारे केंद्र सुरू करा
सीसीआयने तांत्रिक कारणामुळे खरेदी तात्पुरती बंद केली. पणन महासंघचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. सध्या शेतकऱ्यांकडे एकूण उत्पादनाच्या 50 ते 60 टक्के कापूस घरीच साठून आहे. तर काही शेतकऱ्यांचा पूर्ण कापूस घरी पडून आहे. खासगी व्यापाऱ्यांनीदेखील कापूस खरेदी बंद केली आहे. नवीन खरीप हंगाम हळूहळू जवळ येत आहे. कापसाची खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधी शेतकरी मागणी करीत आहेत. काटोल तालुक्‍यात पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. अंदाजे अडीच महिन्यात या खरेदी केंद्रावर एकूण18 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. हे केंद्र दि शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या जागेवर असल्याने या सोसायटीने ही याच खरेदी केंद्रावर गाठीची खरेदी केली.


संपूर्ण व्यवहार बंद
यावर्षी आधीच कापसाचा उतारा कमी असूनदेखील खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस सीसीआयला व पणन महासंघाला हमीभावानुसार विकणे पसंत केले होते. सध्या खासगी व्यापारी आणि जिनिंगवाल्यांनी कापूस खरेदी पूर्णपणे बंद केली आहे. कापसाची बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली आहे. खरीप हंगामास एक महिना शिल्लक असताना शेतकऱ्यांजवळ हंगामापूर्वी पैसा नाही. कोरोनामुळे संपूर्ण व्यवहार बंद आहे. कापूस खरेदी करणे अत्यंत जरुरीचे आहे. नागपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधी आदेश द्यावे. पणन मंडळाचे मंत्री यांनी 20 एप्रिलनंतर खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधी माहिती दिली आहे. त्यानुसार शासनाकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरिता हा आदेश नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकरिता अंमलात आणावा. पणन महासंघाच्या कार्यकारी संचालक मंडळाने हा आदेश नागपूर झोनला लागू करावा, अशी मागणी माजी सभापती वसंत चांडक व प्रगतिशील शेतकरी दिलीप काळमेघ यांनी केली आहे.

शेतमाल खरेदी करणे आवश्‍यक
शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणे आवश्‍यक आहे. यासाठी बाजार समिती मार्फत शासनाला, मागणी करण्यात आली आहे.
बबनराव लोहे
सभापती, नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com