कोरोनामुळे प्रवासीही धास्तावले; मुंबई- पुण्याकडे रिकाम्याच धावताहेत ट्रेन; अनेक ट्रेन रद्द 

Trains to Mumbai and Pune are running empty some cancelled from Nagpur
Trains to Mumbai and Pune are running empty some cancelled from Nagpur

नागपूर ः एरवी हाउसफुल्ल धावणाऱ्या मुंबई दुरांतोला एकूण क्षमतेच्या केवळ ६० टक्केच प्रवासी मिळत आहेत. प्रवासी संख्या कमी असल्याच्या कारणावरून ट्रेन रद्द करण्याचा क्रमही आता सुरू झाला आहे. नागपूर-कोल्हापूर विशेष ट्रेन दोन आठवड्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.

देशासह महाराष्ट्रात कोरोनामुळे भयावह स्थिती दिसून येत आहे. भीतीपोटी प्रवासाचे बेत रद्द केले जात आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये पुरेसे प्रवासीच नसल्याचे चित्र आहे. मुंबई- पुण्याकडील गाड्यांमधील प्रवाशांची संख्या फारच कमी झाली आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्या धडकी भरवणारी असल्याने मिनी लॉकडाउन लावण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकही घराबाहेर पडणे टाळत आहेत. बाहेरगावी जाणेसुद्धा टाळले जात आहे. एसटी आणि रेल्वेतील प्रवासीसंख्येनेच ही बाब अधोरेखित केली आहे. रेल्वेने यापूर्वीच नियमित फेऱ्यांमध्ये मोठी कपात केली आहे. रेल्वेलाही पुरेसे प्रवासी मिळत नसल्याचे चित्र आहे. बुधवार व गुरुवारी मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये असेच चित्र दिसले.

आणखी गाड्या रद्द होतील

पुरेसे प्रवासी नसल्याने श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर ते नागपूरदरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावणारी विशेष गाडी १२ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रवासी संख्या घटत राहिल्यास पुढील काळात आणखी गाड्या रद्द केल्या जाऊ शकतात. रेल्वेच्या नियमानुसार विशेष गाड्या केव्हाही रद्द करण्याची किंवा चालविण्याची मुभा असते.

रेल्वेची तिकीट विक्री खालावली

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा विचार केल्यास एरवी हजारोंच्या संख्येने तिकीट विक्री केली जाते. मुलांना सुट्या लागण्यासह, पर्यटन व लग्नसराईचा काळ असल्याने एप्रिल व मे महिन्यातील तिकीट विक्री उच्चांकी पातळीवर असते. यंदा मात्र तिकीटविक्री चांगलीच रोडावली आहे. सोमवारी ६०४, मंगळवारी ५२६ आणि बुधवारी ५३२ तिकिटांचीच विक्री झाली.

निगेटिव्ह सर्टिफिकेट बंधनकारक

राजस्थान सरकारने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाना, केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर तपासणीसह निगेटिव्ह सर्टिफिकेट बंधनकारक केले आहे. हे प्रमाणपत्र ७२ तासांच्या आतील असणे आवश्यक आहे. तमिळनाडू सरकारनेही रेल्वे प्रवाशांना ई-पास बंधनकारक केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com