आश्‍चर्यच! दोन बहिणींनी 841 किमींचा प्रवास केला दुचाकीने

mumbai nagpur.j
mumbai nagpur.j

नागपूर : कोरोनामुळे अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे नोकरी-व्यवसाय किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर असलेले लोक बाहेरगावीच अडकून पडले. अनेकांजवळचे पैसे संपले. राहण्याचा आणि खाण्याचा भीषण प्रश्‍न समोर उभा ठाकला. मात्र घरी परतण्याचे मार्ग बंदच होते. मुंबईत राहणाऱ्या दोन नागपुरकर बहिणींवरही अशीच वेळ आली. शिक्षण पूर्ण झाले अन्‌ लॉकडाऊनची घोषणा झाली. रोजगारासाठी मुंबईतच राहण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. लॉकडाऊनमुळे उपासमार होत होती. कंटाळून दोघींनी आपल्या दुचाकीवरूनच नागपूरची वाट धरली. शनिवारी भल्या पहाटे मुंबईहून निघालेल्या दोन बहिणींच्या प्रवासाची रविवारी सांगता झाली. 841 किमींचा ऍक्‍टिवाने केलेला हा प्रवास अनेक आव्हानांचा असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन सुरू झाले अन्‌ विस्थापितांनी घरची वाट धरली. रोजगारासाठी मुंबईत विसावलेले चाकरमाने मिळेल त्या वाहनाने आणि वाहन न मिळाल्यास पायीच मूळ गावी परतू लागले. पोट भरायचे कसे हा प्रश्‍न असताना परिवहन मंडळाच्या वाहनांची व्यवस्था करण्याची राज्य सरकारने घोषणा केली. केवळ त्या आशेवर मुंबईत थांबण्याचा काहींनी निर्णय घेतला. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले अर्जही भरले. मात्र परिवहन मंडळाकडून कोणतेच उत्तर आले नाही. शिवाय हेल्पलाईन नंबर देखील हेल्पलेस असल्याचेच अनेकांना जाणवू लागले. ज्यांची राहण्याची अन्‌ खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती अशांचे तर हालच झाले. याच स्थितीत एकेक दिवस काढत असलेल्या दोन बहिणींनी अखेर स्वत:च्या वाहनाने मुंबईहून परतण्याचा निर्णय घेतला.
नागपूर मुंबई महामार्गाची विशेष माहिती नसलेल्या त्या दोघींनी प्रवासाला प्रारंभ केला. थोडे अंतर एकजण, थोडे दुसरी असे त्या वाहन चालवित होत्या. जालना ओलांडले. त्यानंतर जालनाच्या संघस्वयंसेवकांनी सहकार्य करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र माघारी न फिरता पुढे जाण्याचा दोन्ही बहिणींनी निर्णय घेतला अन्‌ दोघी थकलेल्या स्थितीत सिंधखेडराजा येथे पोहोचल्या. मात्र मुंबईहून आल्याचे कळताच दोघींनाही कोणी आसरा देईना. अखेर महामार्गालगत दुकानाच्या पाळीवर रात्र काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रविवारी परततांना उपासमारीने आलेल्या अशक्‍तपणामुळे एकीवर अकोल्यात उपचार करण्यात आले. तर रविवारी सायंकाळच्या सुमारास "त्या दोघी' खापरी येथे पोहोचल्या.

सविस्तर वाचा - खबरदार, रस्त्यांवर जनावरे सोडाल तर...
खापरीच्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन येथे प्राथमिक आरोग्य तपासणी झाल्यानंतर दोघी स्वत:च्या घरी परतल्या. मात्र दोघींचा संघर्ष काही थांबला नव्हता. शेजारच्यांनी घाबरून त्यांना वस्तीत प्रवेश नाकारला. अखेर प्रारंभी राणाप्रतापनगर पोलिस ठाण्यात व नंतर आरोग्य विभागाशी संपर्क करण्यात आला. आता दोन्ही बहिणी घरीच कॉरेंटाईन झाल्या आहेत. त्याचवेळी नागपुरात एकाकी असलेल्या आईचीही तिच परिस्थिती होती. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कौशिक लाकडे त्यांची सेवा करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com