परीक्षेबाबत केंद्राच्या पत्रामुळे विद्यार्थी संघटना आमनेसामने, काय झाला प्रकार...

What do student organizations say about final year exams?
What do student organizations say about final year exams?

नागपूर  : केंद्राच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधारावर विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का पोहचला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारण उफाळण्याची शक्‍यता वाढली आहे. मात्र, या निर्णयाने आता विद्यापीठस्तरावर विद्यार्थी संघटनास्तरावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, एनएसयुआय, युवासेना विरुद्ध अभाविप अशाप्रकारचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे परीक्षेचा घेण्याचे अभाविपने समर्थन केले असताना, तिन्ही संघटनेने त्याचा विरोध केला आहे.

राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राजस्थान, केरळ यासह भाजप शासीत मध्यप्रदेशात शिवराज सरकार, हरियानामध्ये मुख्यमंत्री खट्टर यांनीही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गृह मंत्रालयाकडून आलेल्या पत्रानंतर अनुदान आयोगाने आपला निर्णय बदलवित परीक्षा घेण्याचे निर्देश जारी केलेत.

या प्रकाराने एकीकडे विद्यार्थी आता संभ्रमात असून पालकांची चिंता वाढली आहे. यंत्रणा तयार असली तरी, नेमकी परीक्षा घ्यायची कशी? हा प्रश्‍न आता विद्यापीठांसमोर आहे. असे असताना, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा दाखला देत, अभाविपने परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. कोरोनाची साथ असली, तरी त्यामुळे परीक्षा न देता पदवी घेण्याचा राज्य सरकारचा पर्याय अशैक्षणिक असल्याचे अभाविपचे अमित पटले यांनी सांगितले. या विरोधात परीक्षा नकोच अशी मागणी सत्ताधारी पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी पुन्हा लावून धरली आहे. यासाठी हॅश टॅग मोहिम चालवून यूजीसीने आपला तुघलकी निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली जात आहे.
 
एनएसयुआय कडून यूजीसीच्या निर्णयाची जाळली प्रत


पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा निषेध म्हणून एनएसयूआयने निर्णयाच्या प्रतीचे दहन केले. केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी परीक्षा घेण्याचा विद्याथ्रयांवर लादलेला निर्णय हा विद्यार्थी हिताचा नसून त्यांना करोनाच्या संकटात घालणारा आहे अशी भूमिका एनएसयुआयने मांडली.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालू नये : आमिर नुरी
देशात कोरोनावर नियंत्रण मिळण्यात भाजपा सरकार कमी पडले आहे. सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा कहर पुन्हा वाढण्याची शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असे असताना विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालण्यासाठी परीक्षा घेण्यावरुन राजकारण करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात न घालता, परीक्षा रद्द करण्यात याव्यात असे मत प्रदेश एनएसयुआयचे राष्ट्रीय प्रतिनिधी आमिर नुरी यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com