सर्वत्र "लॉकडाउन', तरिही तंबाखू अन्‌ दारू येते कुठून?

file
file

पाटणसावंगी (जि.नागपूर)  :  कोरोनाला हरविण्यासाठी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. असे असतानाही गावात अवैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला जणू पूर आलेला दिसून येतो. स्थानिक पोलिस प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.


अव्वाच्या सव्वा वसुली
लॉकडाउनच्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंचा काळाबाजार केला तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, जे "तलफ' करतात, त्यांची मोठी अडचण झाली आहे. लोकांना एकीकडे अन्नधान्य मिळत नसले तरी व्यसन करणाऱ्यांना जर्दा, गुटखा, दारू सगळे काही वेळेवर मिळत आहे. फरक फक्त एवढाच की ते चढ्याभावाने विकत घ्यावे लागत आहेत. दारू व तंबाखूचे दर तर गगनाला भिडले आहेत. यात काही आश्‍चर्य नाही. खर्ऱ्याची दुकाने जिथे आहेत, त्या बंद दुकानासमोर जाऊन उभे राहिले की दुकानदार किंवा त्याची मुले ग्राहकाला बरोबर हेरून जवळ येतात. खर्ऱ्याची पुडी गुपचूप ग्राहकाला देतात. ग्राहकही खिशातून पैसे काढून त्याला देतो व निघून जातो, असा प्रकार गावात नियमित सुरू आहे.

पैसे देउन भागविली जाते "तलफ'
मात्र, या घटनेची तक्रार करायची कोठे आणि कोणाकडे, असा प्रश्न आहे. कितीही पैसे खर्चून ते "तलफ' भागवित आहेत. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांनी पैसा कमावण्याचा उद्योग सुरू केलेला आहे. यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ अव्वाच्या सव्वा भावाने विक्री सुरू केलेली आहे. यामध्ये अव्वाच्या सव्वा रुपयांना विकून पैसा कमावण्याचा उद्योग सुरू केला आहे. लॉकडाउनमुळे सर्वच उद्योगधंदे बंद झालेले असून बाहेर फिरण्यास मज्जाव केला जात आहे. सध्या फक्त किराणा, मेडिकल व भाजीपाला विक्री होत आहे. यामध्ये काही किराणा दुकानदारांनी आता चढ्या भावाने किराणा विक्री करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ तर अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू केली असून माल येत नाही, याचा बहाणा केला जात आहे. यामुळे किराणा व्यावसायिक मालामाल होऊ लागलेले आहेत. त्यामुळे अशांचा बंदोबस्त कसा होईल, यावर सर्वांचे लक्ष आहे.


वीस रुपयांचा खर्रा 40 रूपयांत
याकाळात 20 रुपयांना मिळणारा खर्रा 40 रुपयांचा झाला आहे. दोनशे रुपये किमतीचा बाबूल सुगंधित तंबाखूचा डब्बा 500 रुपयांचा झाला आहे. 300 रुपये प्रतिकिलो असलेली सुपारी साडेसहाशे ते सातशे रुपये प्रतिकिलो झाली आहे. तरीही शौकीन घेतात व दुकानदारांकडून लूट सुरू आहे.


गावांमध्ये भीतीचे वातावरण
मध्य प्रदेशातील अशा कोरोनाग्रस्त भागातून दारू व गुटखा खुलेआम चोरट्या मार्गाने रोजच महाराष्ट्रात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा दारू व गुटखाविक्री करणाऱ्यांकडून व दारू पिणाऱ्यांकडून कोरोना आजाराची पसरण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com