आरोग्य केंद्राविना नागरिकांच्या `आरोग्याशी खेळ मांडला’ !

file
file

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) :१९९७ पासून निलडोह येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी जनता रेटून धरत आहे. ग्रामपंचायतीत मासिक मिटींगमध्ये ठराव झाला. आमसभेत पंचायत समिती वार्षिक अहवालात नमूद असले तरी हातात काहीच लागले नसल्याने अनेकांनी हा मुध्दा सोडून दिला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला, अशा संतप्त भावनी नागरिक व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे नागलवाडी, वडधामना या दोन्ही ग्रामपंचायत अनेक वर्षांपासून उपकेंद्राची मागणी करित आहेत. त्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृह गाजविले. मागणी पूर्ण झाली. पण जागेचा बहाणा करुन तिथेच या मुद्दयाला विराम मिळाला आणि उपकेंद्राच्या मुद्द्याची बोळवण झाली.

वाढत्या लोकसंख्येत काळाजी गरज
अमरनगर हा परिसर मोठा आहे. गावात ९०टक्के श्रमिक राहतात. मिळेल ते काम करतात. एमआयडीसी लागून असल्याने प्रदूषनाचा फटकाही सहन करावा लागतो. गावात एकही तज्ज्ञ  डॉक्टर नाही. कामचलावू डॉक्टरकडून लोक उपचार करुन घेतात. किंवा दूरच्या हिंगणा, रायपूर येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात. साधनांचाही अभाव जाणवतो. तेव्हा ग्रामपंचायत निलडोहच्या बाजूला एमआयडीसीची आरक्षित जमिन खाली पडून आहे तिथेच  प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, असे ग्रा.पं.सदस्य सुभाष खडेकार यांनी सूचविले. नागलवाडी हे जूने गाव. एमआयडीसी बनली तेव्हा अनेकांच्या शेतीही गेली. गाव तोडल्या गेली. एक स्वतंत्र नागलवाडी ग्रामपंचायत निर्माण झाली. त्यात डिफेन्स येथे एक आहे, दोन वार्ड नागलवाडी गावाचा समावेश आहे. एकूण तिन वार्ड येथे असून गावात शेतकरी,  शेतमजूराचे  हे गाव आहे. ग्रामपंचायत गावकऱ्यांना सर्व सोई पुरविते. पण आरोग्यासाठी कुठलीच या गावात शासनाने सोय केली नाही. गावात एकही डॉक्टर येत नाही. खासगी दवाखाना नाही. थोडा जरी गावकऱ्यांना त्रास झाला तर वानाडोंगरी येथील खासगी दवाखान्यात जावे लागते. पैसेही मोजावे लागतात.रायपूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र दूरची गोष्ट आहे. एवढे जुने गाव असूनही आजतागायत येथे उपकेंद्रसुध्दा मिळू शकले नाही, अशी खंत नागलवाडीच्या सरपंच रेखाताई नानाभाऊ लापकाले
 यांनी व्यक्त केली.

मी उपकेद्रासाठी आग्रही राहणार
वडधामना हे शेतकरी, शेतमजूरांचे गाव. अमरावती महामार्ग बनल्याने या परिसरात मोठमोठ्या कंपन्याचे गोडाऊन आहेत. त्यात येथील मोठा वर्ग हमाली करतात. काम करित असतांना कुणाला काही इजा झाली तर वाडीला किंवा वानाडोंगरी येथे उपचार करण्यासाठी धावपळ करावी लागते. वडधामना या ग्रामपंचायतमध्ये पाच वार्डाचा समावेश आहे. लोकसंख्या २५ हजाराच्या जवळपास आहे. पण कुठल्याही आरोग्य सुविधा नाहीत. महिला, गरोदर मातांना. बाळाला, आरोग्य सेवा गावातच मिळावी. कारण हा वर्ग फार गरिब आहे. म्हणून गावात उपकेंद्र निर्माण व्हावे, यासाठी मी आग्रही राहणार असल्याचे पं.स.सदस्य बबीता आंबटकर म्हणाल्या. गोरगरीब महिलांना उपकेंद्र नसल्याने  मोठा त्रास सहन करावा लागतो. या परिसरात अत्यंत आवश्यक आहे. पण कुणाचेही लक्ष  नाही. रोड, नाल्या, रस्ते याकडेच लोकांचे लक्ष असते. पण गावातच लोंकाना आरोग्यासाठी सेवा मिळावी, याकडे फारसे लक्ष नसते. अनेकांनी प्रयत्नही केले पण ते यशस्वी झाले नाही. पण मला वाटते हे उपकेंद्र झाले पाहिजे. पुन्हा नव्याने मी ग्रामपंचायतच्या मासिक मिटींगमध्ये ठराव घेऊन संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार करण्याचा विश्‍वास वडधामण्याच्या सरपंच शशिकला नारायण इवनाते यांनी व्यक्त केला.

जागेसाठी अडले उपकेंद्र
मागील कालावधीत माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य होती. शिक्षण सभापती पण होती. तेव्हा ग्रामपंचायत मासिक मिटींगचा ठराव आमसभेचा ठराव घेऊन जिल्हा परिषद येथेही निर्णय घेतला. वडधामण्यात एक उपकेंद्र लोंकाच्या मागणीप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे निर्माण व्हावे. तेव्हा खूप परिश्रम गेतले. जागेसाठी पाहणी झाली. वानाडोंगरी ते वडधामना या मार्गावरील गजानन मंदिराजवळ खाली असलेल्या डोंगराळ जमिनीत उपकेंद्र निर्माण करण्याचे ठरले, पण नंतर जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष दिले नाही. प्रशासनाने लक्ष दिले असते तर आज उपकेंद्र नागलवाडी आणि वडधामना या दोन ग्रामपंचायत येथील नागरिकांना सेवा मिळाली असती, अशी अपेक्षा वडधामण्याचे उपसरपंच रंगराव पाल यांनी केली. मी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून निवडून आलो. मागील १५ वर्षांपासून लोक मागणी करत आहेत. नेत्यांनी मोठमोठी पदे उपभोगली.जिल्हा परिषदेत फाईल पडून आहे. पंचायत समितीचा ठराव एकमताने मंजुर झाल्याची वार्षिक अहवालात रेकार्डवर नोद असताना का थांबले? कारण शेवटी गरिबांचे कुणीच नाही असे दिसून येते. एवढ्या जमिनी एमआयडीसीत गेल्या, गावातील मुलांना खेळण्यासाठी, ‘मार्निंग वाक’ करण्यासाठी मैदान नाही, हा प्रश्‍न विकासात येत नाही का? नाली, रस्ते झाले म्हणजे विकास पूर्ण झाला का, असा प्रश्‍न निलडोहचे ग्रा.पं.सदस्य रमेश मासुरकर यांनी केला.

या मुद्दयासाठी रस्त्यावर उतरणार
जि.प.ची पहिली मिटींग झाली. त्यात रायपूर प्राथमिक केंद्राची पहाणी केली. धोकादायक इमारत पाडण्याचा निर्णय असताना तिला पाडण्यात आली नाही. नवीन इमारतीला मंजूरी मिळाली, तरी पर्यायी आरोग्य केंद्राची व्यवस्था करुन ‘टेंडर’ काढून नवीन इमारत बांधकाम करण्यात यावे, अशी मी मागणी केली होती. पण यावर काहीच झाले नाही. ही इमारत ६० वर्षाची झाली. महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाची सर्वात जास्त लोकसंख्या असलेली पीएससी आहे. १३ कोटी ७३ लाख२६ रूपये निधी मंजूर झाला. शासकीय मान्यता मिळाली, पण आज यावर काम सुरू झाले नाही.  आज २ लाखांचा भार ४ जिल्हा परिषदमधील लोकांना रुग्णसेवा देते. हे सर्व मुद्दे मी मांडले. पण यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. मी रायपूर हिंगणा प्राथमिक आरोग्य केंद्राचा अध्यक्ष आहे.  आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी रस्त्यावर उतरणार आणि जनतेला मिळालेल्या अधिकाराची सुरक्षा करणार.
-राजू हरडे
जि.प.सदस्य

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com