गेल्या दहा वर्षांत वाघ, बिबटाच्या हल्ल्यात तब्बल १०१ लोकांचे बळी; मानवी हस्तक्षेपामुळे संघर्ष   

101 people are no more in last 10 years by attack of wild animals
101 people are no more in last 10 years by attack of wild animals

राजुरा (जि. चंद्रपूर)  : औद्योगीकरण आणि आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे वनक्षेत्र कमी होत आहे. वन्यजीवांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढलेला आहे. यामुळे अलीकडच्या काळात वन्यजीव व मानवी संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे. जिल्ह्यात मागील दहा वर्षांत वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात 101 लोकांचा बळी गेलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील वन्यजीव संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

जिल्ह्यातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्य चांदा वनविभागांतर्गत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात 101 नागरिक ठार झालेले आहेत. यात वाघाच्या हल्ल्यात 79, बिबट्याच्या हल्ल्यात 22 नागरिकांचे बळी गेल्याची माहिती इको प्रो- संस्थेने दिली आहे. ताडोबा अभयारण्यामुळे जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रसिद्ध आहे. वाघांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात अलीकडे वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. 

मागील तीन वर्षांत वन्यजीव संघर्षात वाघ व बिबट्याने 54 नागरिकांचे जीव घेतले आहेत. यात 2018 ते 2020 पर्यंत वाघाने 45 बळी घेतले आहेत. माणसांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे जंगल व्याप्त लगतच्या गावांमध्ये प्रचंड दहशत आहे. वाघाच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर बळी जात असल्यामुळे कुटुंब उघड्यावर आलेले आहेत. अलीकडच्या काळात मध्य चांदा वनविभागांतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत या क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात दहा शेतकरी व शेतमजुरांचा बळी गेलेला आहे.

पर्यावरणातील अन्नसाखळी खंडित

जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक वाघ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सत्तर प्रजननक्षम वाघिणी आहेत. एक वाघीण साधारणपणे चार बछड्यांना जन्म देते. दोन वर्षांतून प्रजनन होत असते. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या संगोपनातील मृत्यू दर कमी आहे. त्यामुळे अलीकडे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत वनक्षेत्र वाढलेले नाही. त्यामुळे वाघांच्या अधिवासावर वनक्षेत्र मर्यादित पडत आहे. वन्यजीवांचे अधिवास धोक्‍यात आल्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक जीव जगण्याचा प्रयत्न करीत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील अन्नसाखळी खंडित झालेली आहे. याचा परिणाम वन्यजीव व मानवी संघर्षात झालेला आहे असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.

वन्यजीव व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी तसेच मानवी संघर्ष टाळण्यासाठी शासनानेही विविध योजना आखलेल्या आहेत. मात्र, मानवाने सहकार्य करणे गरजेचे आहे तेव्हाच वन्यजीव व मानवी संघर्ष आटोक्‍यात येऊ शकतो.

नरभक्षक वाघ जेरबंद केव्हा होणार?

मागील 22 महिन्यांपासून राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने दहा शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतलेला आहे. वाघाला पकडण्यासाठी मागील नऊ महिन्यांपासून मोहीम सुरू आहे. मात्र, वन विभागाला यश आलेले नाही. या मोहिमेला तीनदा मुदतवाढ मिळालेली आहे. शेतकरी दहशतीखाली जीवन जगत आहेत. शेतावर जाणे बंद आहे. वाघाला ठार मारण्यासाठी काही दिवसांपूर्वी राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रात शेतकरी व शेतमजुरांनी आंदोलन केले. यामुळे वनविभाग जागा झालेला आहे. वनविभाग वेगवेगळे प्रयोग करीत आहे. मात्र, वाघही सावध झाल्यामुळे वन विभाग व वाघांमध्ये अकबर-बिरबलाचा खेळ सुरू झालेला आहे. त्यामुळे अजूनही वाघ जेरबंद झालेला नाही.

वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रत्येकानी सतर्क असणे आवश्‍यक आहे. जंगलव्याप्त लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यजीव संघर्ष दिसून येतो. यासाठी शासनाच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करणे गरजेचे आहे. वाघाचा वावर असणाऱ्या क्षेत्रात व शक्‍यतोवर प्रतिबंधित क्षेत्रात गुराखी व शेतकऱ्यांनी जाणे टाळले पाहिजे. वन विभागानेही वेळोवेळी सूचना देऊन शेतकऱ्यांना सतर्क करणे गरजेचे आहे.
- बंडू धोतरे
इको-प्रो, चंद्रपूर

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com