वर्धा : तमिळनाडूमधील थेनी जिल्ह्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील 1 हजार 349 व्यक्तींना घेऊन मदुराईहून निघालेली ट्रेन सोमवारी (ता. 25) रात्री उशिरा वर्ध्यात पोहोचली. यामध्ये विदर्भातील 192 नागरिक आले. त्यांना रात्रीच राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यात आले.
मात्र त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. यामध्ये वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यातील विद्यार्थी, नोकरदार आणि कामगारांचा समावेश आहे.
यामध्ये अकोला दोन, अमरावती 32, चंद्रपूर 21, भंडारा 25, गडचिरोली 23, नागपूर 33, गोंदिया 33, यवतमाळ दोन आणि वर्धा 14 नागरिकांचा समावेश होता. यासाठी महामंडळाच्या 10 बसेसचा वापर करण्यात आला. लॉकडाउनमध्ये राज्यातील काही विद्यार्थी, नोकरदार व कामगार इतर राज्यात अडकले आहेत. त्यांना राज्य सरकारची परवानगी घेऊन महाराष्ट्रात आणण्यात येत आहे.
तमिळनाडू राज्यातील थेनी जिल्ह्यात राज्यातील 1 हजार 349 नागरिक अडकले होते. यामध्ये पुणे विभाग 302, नाशिक विभाग 101, मराठवाडा विभाग 754; तर विदर्भातील 192 लोकांचा समावेश होता. त्यांना महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी मदुराई येथून श्रमिक ट्रेन 23 मे रोजी रात्री 10 वाजता निघाली. ही ट्रेन 25 मे रोजी महाराष्ट्रात पोहोचली.
पुणे, मनमाड, परभणी येथे या गाडीला थांबा देण्यात आला होता. नागरिकांना त्या त्या थांब्यावर सोडत शेवटी ही रेल्वे वर्ध्यात स्थिरावली. विदर्भातील 192 लोकांना वर्धा रेल्वेस्थानकावर उतरविण्यात आले. आलेल्या 192 प्रवाशांमध्ये सात बालकांचा समावेश आहे. प्रवाशांची रेल्वेस्थानकावरच दोन आरोग्य पथकांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.